Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन
Monsoon Return : मान्सूनने नमनालाच घडाभर तेल ओतले. जून कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात जोरदार बॅटिंग केली. पण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही पट्ट्यात पावसाची प्रतिक्षा कायम आहे. आता परतीच्या पावसानेही चिंता वाढवली आहे.

भारतात यंदा मान्सून जवळपास दोन दशकात सर्वाधिक कमकुवत राहण्याचा अंदाज आहे. रॉयटर्सच्या वृत्तात हवामान खात्यातील दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, मान्सूनसाठी महत्त्वाचा अखेरचा महिना, सप्टेंबरमध्ये सुद्धा कमी पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. या दरम्यान देशातंर्गत सरासरी पावसापेक्षा जवळपास 15 टक्क्यांपर्यंत कमी पाऊस होईल. असे झाले तर 2009 नंतर देशाला पहिल्यांदाच सर्वाधिक कमकुवत मान्सूनला सामोरे जावे लागेल. यामुळे रब्बी हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाने काही पट्ट्यात रेकॉर्डब्रेक हजेरी लावली. पण अनेक भागात पावसाची प्रतिक्षा आहे. पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे मान्सून जाता जाताही जीवाला घोर लावत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
अनेक पिकांना फटका
भारताचा जवळपास 70 टक्के पाऊस हा मान्सूनवरच अवलंबून आहे. पावसाच्या तुटीमुळे खरीप पिकांचे उत्पादन, खाद्य किंमती आणि ग्रामीण उत्पन्नावर मोठा परिणाम होतो. खासकरून सप्टेंबरमध्ये जर मुबलक पाऊस झाला नाही तर कापूस, सोयाबीन, मक्का आणि डाळींच्या उत्पादनावर मोठा परिणाम होईल. गव्हासह मोहरीच्या उत्पादनासाठी जमिनीत ओलावा नसल्यास परिणाम होईल. अर्थात हा अद्याप अंदाज आहे. एल निनो, सुपर एल निनोच्या चर्चा होत असतानाही पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी अजूनही आशा सोडलेली नाही.
सप्टेंबर महिन्यातील पावसावर सर्वांची नजर
या वृत्तानुसार, सप्टेंबर महिन्यात एल निनोचा परिणाम प्रकर्षाने दिसेल. हवामान विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानुसार सप्टेंबर महिन्यात पाऊस दोन अंकी घसरण नोंदवू शकतो. यंदा या मान्सूनमध्ये आतापर्यंत सरासरी पावसात 13 टक्क्यांची कमी दिसून आली. जुलै महिन्यात एक टक्का अधिक पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात पावसाचा लहरीपणा पुन्हा दिसला. मराठवाड्यासह अनेक भागात पावसाने घोंगडी पांघरली. पाच मिनिटं, दहा मिनिटं असा पाऊस होत आहे. त्याला ही जोर नाही.
मान्सून लवकरच काढता पाय घेणार?
देशात मान्सून लवकरच टाटा -बाय करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पुढील महिन्याच्या मध्यातूनच पाऊस माघारी फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर-पश्चिम, मध्य भारतातून सप्टेंबरच्या मध्यात मान्सून माघारी फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर उर्वरीत भागात तो ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत रेंगाळण्याची शक्यता आहे.