डोक्यावर वार, पदरानेच गळा आवळला, नगरमध्ये 30 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या
डोक्यावर हत्याराने वार करुन अंगावरील साडीच्या पदरानेच तिचा गळा आवळण्यात आल्याचा आरोप आहे. महिलेची ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर केमिकल टाकून तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता
अहमदनगर : 30 वर्षीय महिलेचा हत्या झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आली आहे. डोक्यावर हत्याराने वार करुन अंगावरील साडीच्या पदरानेच तिचा गळा आवळण्यात आला. श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव शिवारात हा प्रकार घडला.
काय आहे प्रकरण?
डोक्यावर हत्याराने वार करुन अंगावरील साडीच्या पदरानेच तिचा गळा आवळण्यात आल्याचा आरोप आहे. महिलेची ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर केमिकल टाकून तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुरेगाव येथील एका शेतातील जमिनीच्या बांधावर महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना कळवली.
पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी फॉरेन्सिक तसेच डॉग स्कॉडला पाचारण करत वरिष्ठांना कल्पना देत पाहणी केली. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात पोलिस पाटील महादेव तान्हाजी रोडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी तपास निरीक्षक दुधाळ करत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये पतीकडून पत्नीची हत्या
दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील एका जोडप्यामध्ये फेसबुक चॅटिंगवरुन झालेला वाद इतका वाढला, की पतीने आपल्या पत्नीचा जीव घेतला. पतीला संशय होता की पत्नी चॅटिंगद्वारे इतर पुरुषांशी मैत्री करत आहे. यामुळे त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. अखेर वाद इतका विकोपाला गेला, की पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही खळबळजनक घटना पश्चिम बंगालमधील हुगली जिल्ह्यातील आहे.
नेमकं काय घडलं?
हुगळी जिल्ह्यातील चंदननगर पोलीस स्टेशन परिसरात पती रिंटू दासने पत्नी पल्लवी दासचा (23 वर्ष) गळा दाबून खून केला. याचं कारण म्हणजे पत्नी सतत फेसबुक चॅटिंगमध्ये बिझी असायची. आरोपी पती रिंटू दासला संशय होता, की त्याची पत्नी पल्लवी फेसबुक चॅटद्वारे इतर पुरुषांशी मैत्री करत आहे. यामुळे त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर शंका होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी श्रीरामपूर गिरवळ येथून रुग्णालयात पाठवला.
भाऊ संशयी, वहिनीला मारहाण
आरोपी रिंटू दासचा भाऊ सिंटू दास याने सांगितले की वहिनी चांगल्या स्वभावाची होती पण आपला भाऊ नेहमी तिच्यावर संशय घ्यायचा आणि नेहमी तिला मारहाण करायचा.
पोलीस तपास सुरु
आरोपीची आई माना दास यांनी सांगितले की तिची सून पल्लवी दासला फेसबुक चॅटिंगची आवड होती, त्यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत असत. या हत्येविषयी माहिती देताना चंदननगर आयुक्तालयाचे डीसीपी मुख्यालय प्रवीण प्रकाश म्हणाले की, आरोपी पती रिंटू दासला पोलिसांनी भादंविच्या कलम 302 आणि 498 ए अंतर्गत अटक केली आहे. या प्रकरणी पुढील कारवाई केली जात आहे.
संबंधित बातम्या :
वहिनीची चाकूने भोसकून हत्या, दीराला अटक
दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला