एकतर्फी प्रेमातून शिवीगाळ, पोलिसात तक्रार केल्याने चाकूहल्ला, 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू
गुरुवार म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी एका 27 वर्षीय तरुणाने 20 वर्षीय मुलीवर चाकूहल्ला केला होता. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
![एकतर्फी प्रेमातून शिवीगाळ, पोलिसात तक्रार केल्याने चाकूहल्ला, 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू एकतर्फी प्रेमातून शिवीगाळ, पोलिसात तक्रार केल्याने चाकूहल्ला, 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/09/13170448/Chandrapur-Knife-Attack.jpg?w=1280)
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर परिसरातील चाकू हल्ला झालेल्या 20 वर्षीय तरुणीचा अखेर मृत्यू झाला. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारा दरम्यान आज सकाळी तिचा मृत्यू झाला. एकतर्फी प्रेमातून शिवीगाळ केल्यानंतर पोलिसात तक्रार केल्याने 27 वर्षीय तरुणीने तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
गुरुवार म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी एका 27 वर्षीय तरुणाने 20 वर्षीय मुलीवर चाकूहल्ला केला होता. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऐन सणांच्या काळात गजबजलेल्या भागात झालेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
चंद्रपूर शहरातील अतिशय वर्दळीच्या महाकाली मंदिर मार्गावर 9 सप्टेंबर रोजी प्रफुल्ल आत्राम या 27 वर्षीय तरुणाने मुलीवर चाकूहल्ला केला होता. पोलिसांनी आरोपी प्रफुल्ल आत्राम याला अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे या मार्गावर असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटनेनंतर पळताना आरोपी कैद झाला होता.
तरुणी-आरोपीची 2019 पासून एकमेकांशी ओळख
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या प्रकरणातील पीडित तरुणी आणि आरोपी एकाच भागात राहणारे असून त्यांची 2019 पासून एकमेकांशी ओळख होती. आरोपीचे पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम होते आणि यातून त्यांच्यात खटके उडायचे.
तरुणीला आरोपीची शिवीगाळ
पीडित तरुणी ज्या खाजगी रुग्णालयात काम करायची त्या रुग्णालयात आरोपीने 1 सप्टेंबरला जाऊन त्या मुलीला शिवीगाळ केली होती आणि याबाबत रामनगर पोलीस स्टेशनला गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता. याच रागातून ही तरुणी रुग्णालयातून घरी जात असताना आरोपीने तिच्यावर चाकू हल्ला केला होता.
एकतर्फी प्रेमातून भीषण हत्याकांड
एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्रात घडलेल्या भीषण हत्येच्या घटनांची आठवण काढताना उल्हासनगरची रिंकू पाटील, सांगलीची अमृता देशपांडे ही नावं प्रामुख्याने समोर येतात. उल्हासनगरमध्ये रिंकू पाटील (Rinku Patil) नावाच्या किशोरवयीन तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली होती. 30 मार्च 1990 रोजी घडलेल्या या घटनेच्या वाईट स्मृती जवळपास 31 वर्षांनंतरही अनेक जणांच्या मनात कायम आहेत. रिंकू पाटीलला उल्हासनगरमध्ये दहावीच्या परीक्षा केंद्रातच पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं होतं.
यवतमाळमध्ये युवतीची एकतर्फी प्रेमातून हत्या
दुसरीकडे, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात राहणाऱ्या युवतीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी समोर आला होता. खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या रामपूर नगर भागात सुवर्णा अर्जुन चव्हाण ही 21 वर्षीय युवती सहकुटुंब राहत होती. गावात राहणारा 25 वर्षीय आरोपी आकाश श्रीराम आडे याचे सुवर्णावर एकतर्फी प्रेम होते. सुवर्णाचे वडील, आई, भाऊ बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून आरोपी आकाश तिच्या घरात शिरला. सुवर्णाच्या पोटात आकाशने चाकू आणि गुप्तीने वार केले. गंभीर जखमी झाल्यामुळे सुवर्णाला प्राण गमवावे लागले
संबंधित बातम्या :
एकतर्फी प्रेमातून 25 वर्षीय मुलाचा तरुणीवर चाकूहल्ला, 3 तासात आरोपीला बेड्या