HSC Exam : बारावीच्या परीक्षा तोंडावर, प्रलंबित मागण्यांसाठी शाळा देण्यास नकार, शिक्षण संस्थांचा बहिष्काराचा इशारा, नेमकं काय घडणार?
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळकडून दहावी बारावी बोर्ड परीक्षांवर बहिष्कार टाकायचा की नाही ? यासंदर्भात उद्या निर्णय घेणार आहे.

मुंबई: कोरोना (Corona) विषाणू संसर्गाचं सावट दूर होत असून आता 4 मार्चपासून बारावीच्या (HSC) परीक्षा सुरु होत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे दहावी (SSC) आणि बारावीच्या परीक्षांवर मोठं संकट निर्माण झालंय. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळकडून दहावी बारावी बोर्ड परीक्षांवर बहिष्कार टाकायचा की नाही ? यासंदर्भात उद्या निर्णय घेणार आहे. बारावी बोर्ड परीक्षा ही 4 मार्च पासून सुरु होत असताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळकडून दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांवरील बहिष्कारा संदर्भातील इशारा देण्यात आला आहे. राज्यातील संघटनेचे पदाधिकारी आणि शिक्षकांसोबत बैठक घेऊन उद्या निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं यापूर्वी देखील राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता.
शिक्षण संस्थांच्या मागण्या काय?
वेतनेतर अनुदान मिळावं,पवित्र पोर्टल रद्द करावे, अशा मागण्यांसाठी राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दहावी बारावी बोर्ड परीक्षेला आपल्या शाळा सेंटर म्हणून देण्यास नकार देत बहिष्काराचा इशारा दिला आहे.त्यानंतर आज महामंडळ पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊन या मागणी संदर्भात तातडीने विचार करावा, अशी विनंती केली. पवारांच्या भेटीनंतर या मागण्यांसंदर्भात सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर पुन्हा एकदा या संघटनेची सर्व विभागातील शिक्षकांसोबत बैठक होणार असून त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय गव्हाणे यांनी सांगितलं आहे.
निर्णय घ्यावा लागणार?
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बोर्डाच्या 10 वी 12 च्या परीक्षांना शाळेच्या इमारती देण्यास महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडाळचा नकार दिलाय. आता परीक्षा एका दिवसावर आली असताना राज्य सरकारला शिक्षण संस्था महामंडळाच्या मागण्या मन्य कराव्या लागतील, अशी शक्यता वर्तवली जातेय. राज्य सरकार यामधून नेमका काय मार्ग काढते हे पाहावं लागणार आहे.
4 मार्चपासून बारावीच्या परीक्षा सुरु
कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या वर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. आता कोरोना विषाणू, ओमिक्रॉनच्या तिसऱ्या लाटेचं सावट दूर होत आहे. त्यामुळं राज्य बोर्डानं निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाण बारावीच्या परीक्षा 4 मार्चला सुरु होतील. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे.
इतर बातम्या:
दारुच्या नशेत नातुची आजीला मारहाण, महिला कार्यकर्त्यांनी घडवली शिवसेना स्टाईलने अद्दल
