राजपाल यादवनंतर आता एका बॉलिवूडच्या मोठ्या अभिनेत्रीला चेक बाऊन्स प्रकरणात वॉरंट
राजपाल यादवनंतर आणखी एका मोठ्या बॉलिवूड अभिनेत्रीला चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे आणि ही अभिनेत्री कोण आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या..

चेक बाऊन्सप्रकरणी अभिनेता राजपाल यादवला तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री अडचणीत सापडली आहे. मुरादाबाद न्यायालयाने 2017 मधील एका कार्यक्रमाच्या वादाच्या संदर्भात तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अमीषा पटेल आहे. या प्रकरणावर अमीषाने प्रतिक्रिया दिली आहे. हा खटला जुना असून तो वाद आधीच मिटलेला असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही तिने दिला आहे. अमीषा पटेलवर मुरादाबाद इथल्या एका कंपनीचे मालक पवन कुमार वर्मा यांनी 2017 मध्ये दाखल केलेल्या चेक बाऊन्स प्रकरणात मुरादाबाद न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. या प्रकरणावर मौन सोडत अमीषाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहिली आहे.
इन्स्टा स्टोरीमध्ये अमीषाने स्पष्ट केलं आहे की हा खटला जुना आणि आधीच निकाली लागलेला आहे. त्यामुळे तिचे वकील आता पवन वर्मा यांच्याविरुद्ध फसवणुकीबाबत फौजदारी कारवाई सुरू करतील. ‘माध्यमांमधील बातम्यांवरून मला समजलंय की पवन वर्मा नावाच्या व्यक्तीने मुरादाबाद इथं काही कारवाई केली आहे. मी सर्वांना कळवू इच्छिते की हे 15 वर्षे जुनं प्रकरण आहे, ज्यामध्ये पवन वर्मा यांनी सेटलमेंट डीलवर स्वाक्षरी केली होती. त्यांना संपूर्ण रक्कम मिळाली होती. तरीही असं दिसतंय की त्यांनी खोटे आरोप करत खटला दाखल केला आहे. माझे वकील या व्यक्तीच्या खोट्या दाव्यांचा आणि फसवणुकीचा पर्दाफाश करण्यासाठी त्याच्याविरुद्ध योग्य फौजदारी कारवाई सुरू करत आहेत. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यास आणि खोटे दावे करून लोकांचं लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक तमाशा बनवणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करण्यास प्राधान्य देत आहे’, असं तिने लिहिलं आहे.
सोमवारी मुरादाबाद एसीजेएम-5 न्यायालयाने नियोजित सुनावणीला अनुपस्थित राहिल्यामुळे अमीषाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. आता तिला 27 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
2017 मध्ये मुरादाबाद इथल्या इव्हेंट मॅनेजर पवन वर्मा यांनी तक्रार दाखल केली होती की अमीषा पटेलने शहरातील एका लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 11 लाख रुपये घेतले होते. हे पैसे स्वीकारल्यानंतरही ती कार्यक्रमाला उपस्थित राहिली नव्हती. या तक्रारीनुसार, अमीषा मुंबईहून दिल्लीला प्रवास करत होती. परंतु तिथे पोहोचल्यावर तिने अतिरिक्त 2 लाख रुपये रोख मागितले होते. जेव्हा इव्हेंट कंपनीने अतिरिक्त रक्कम देण्यास नकार दिला, तेव्हा ती कार्यक्रमात सहभागी न होता थेट मुंबईत परतली.
या घटनेनंतर पवन वर्मा यांनी अमीषा आणि तिच्या टीमविरोधात मुरादाबाद न्यायालयात खटला दाखल केला. दोन वर्षांपूर्वी अमीषा मुरादाबाद न्यायालयात हजर झाली होती आणि तेव्हा तिला जामीन मिळाला होता. परंतु त्यानंतर तिने जामिनाच्या अटींचं पालन केलं नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे न्यायालयाने तिला पुन्हा अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.
