Amitabh Bachchan : जया बच्चन यांचा ‘ओरडा’ टाळण्यासाठी अमिताभ बच्चन काय करतात? सांगितला मजेशीर किस्सा
कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन आणि घरगुती जीवनाबद्दल अनेक खुमासदार किस्से सांगितले. त्यांच्या कौटुंबिक जीवनातील हे गोड अनुभव चाहत्यांसाठी खूप मनोरंजक आहेत.

बच्चन फॅमिली.. बॉलिवूडमधल्या या सर्वात लोकप्रिय कुटुंबाबद्दल सिने-चाहत्यांमध्ये नेहमी कुतूहल असतं. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) , जया बच्चन,अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या, आराध्या यांच्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. त्यांच्याबद्दल अनेक प्रश्नही मनात असतात. ‘ कौन बनेगा करोडपती’ च्या सेटवर अमिताभ बच्चन हे अनेकदा त्यांचे वैयक्तिक अनुभव, किस्सेही सांगत असतात. कधी कधी स्पर्धक किंवा चाहते त्यांना खासगी आयुष्याबद्दलही प्रश्न विचारतात. सध्या ‘ कौन बनेगा करोडपती सीजन 18 ‘ सुरू असून अशाच एका एपिसोडमध्ये अमिताभ यांनी त्यांची पत्नी जया (Jaya Bachchan) यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. शोमध्ये आलेल्या एका स्पर्धकाने त्यांना जो प्रश्न विचारला तो ऐकून सगळेच हसू लागले, पण अमिताभ यांनी त्या प्रश्नाचं अतिशय खुबीने उत्तर दिलं,.
कौन बनेगा करोडपतीच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये एका स्पर्धकाने अमिताभ यांना विचारला की, जर तुम्हाला घरी यायला कधी उशीर झाला तर तुम्हालाही ओरडा मिळतो का ? पत्नी जया बच्चन तुम्हाला ओरडतात का ? असं त्या स्पर्धकाने बिग बींना थेट विचारलं. ते ऐकून आधी सगळे अवाक् झाले, मग हळूहळू खुसफूस पिकली आणि अमिताभ यांनी त्यावर दिलेलं उत्तर ऐकून तर …
जया बच्चन यांचा ओरडा खावा लागू नये म्हणून…
अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन यांच्या रागापासून वाचण्यासाठी आपण काय शक्कल लढवतो, याचा मजेशीर खुलासा शोदरम्यान केला. त्यांनी सांगितलं की, शूटिंगमुळे उशीर होणार असेल तर ते सकाळीच कुटुंबातील सदस्यांच्या ग्रुपवर मेसेज करून घरी उशिरा येणार असल्याची माहिती देतात.
अमिताभ म्हणाले, “ मला आधीच माहीत असतं की उशीर होणार आहे, त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर मी लगेच आमच्या फॅमिली ग्रुपवर मेसेज करतो. आज शूटिंगमुळे उशीर होईल, त्यामुळे माझी जेवणासाठी वाट पाहू नका, असं आधीच सांगतो. हा मेसेज आधीच टाकून ठेवला की प्रॉब्लेम नसतो. पण जर सांगितलं नाही, तर मात्र ‘तुम्ही आधी का सांगितलं नाही? ही काय घरी येण्याची वेळ आहे?’ असं ऐकावं लागतं” अशी गंमत बिग बींनी सांगितली. मला यायला खूपच उशीर झाला तर जया बच्चन आधीच जेवून घेतात आणि झोपायला जातात, असंही त्यांनी नमूद केलं.
घरी स्टाफ नसेल तर स्वत:ची कामं स्वत:च करतो
स्टाफ घरी नसताना घरातील कामं कोण करतं, असाही एक प्रश्न विचारण्यात आला, त्यावर अमिताभ म्हणाले, की स्टाफ नसल्यास ते स्वतःच घरातील कामं करतात. “ चार असोत, आठ असोत किंवा दहा असोत, स्टाफ घरी नसेल तर सगळी कामं मीच करतो. साफसफाई करतो. स्वयंपाक मात्र मला येत नाही. त्यामुळे कधी बाहेरून जेवण मागवतो, तर कधी त्यांनाच ( जया बच्चन) सांगतो, तुम्हीच काहीतरी बनवून द्या.” अस बिग बी म्हणाले.
जया बच्चन यांनी बनवली चक्क आंब्याची खीर
याच संवादादरम्यान अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया यांच्याबद्दलचा आपुलकीचा किस्साही सांगितला. ते म्हणाले की, मी खीर खाणे बंद केलं आहे. मात्र, जया बच्चन यांनी माझ्यासाठी खास आंब्याची खीर बनवली. ती खीर खूप आवडल्याचंही त्यांनी नमूद केलं.
