सर्वांत लोकप्रिय मालिका होणार बंद; मराठमोळ्या अभिनेत्रीला मोठा धक्का
'भाभीजी घर पर है' या मालिकेच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर येत आहे. 'भाभीजी घर पर है 2.0' हा शो लवकरच बंद होणार असल्याचं समजतंय. यामागचं कारण समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत शिल्पा शिंदेची एण्ट्री झाली होती.

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय कॉमेडी मालिका ‘भाभीजी घर पर हैं 2.0’चा काही महिन्यांपूर्वीच प्रीमिअर झाला होता. यामध्ये अंगुरी भाभीच्या भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदेची घरवापसी झाली होती. परंतु आता शिल्पाच्या कमबॅकनंतर अवघ्या दोन महिन्यांतच ही मालिका बंद होणार असल्याचं कळतंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘भाभीजी घर पर हैं 2.0’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून ‘अँड टीव्ही’मध्ये होणाऱ्या मोठ्या बदलांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. ही वाहिनी नवीन कंटेंट बंद करण्याचा विचार करत असून ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेच्या कलाकारांना 5 एप्रिल रोजी शेवटच्या एपिसोडचं शूटिंग करण्यास सांगितलं आहे.
मे 2026 पासून अँड टीव्ही एक पेड री-रन चॅनल बनण्याची शक्यता आहे. नवीन व्यवस्थापनाकडून पदभार स्वीकारल्यानंतर हा बदल लागू होईल. या चॅनलच्या धोरणात बदल करण्याची योजना आखली जात आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत चॅनल नवीन कार्यक्रमांवर लक्ष केंद्रीत करणं थांबवणार आहे आणि फक्त जुने शोज प्रसारित करणार आहे. याचा थेट परिणाम चॅनलवरील सध्याच्या शोज आणि मालिकांवर होणार आहे. चॅनलच्या सर्वांत लोकप्रिय आणि सर्वाधिक काळ चाललेल्या मालिकांपैकी एक ‘भाभीजी घर पर हैं’ ही मालिका आहे. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग असून त्या सर्वांची आता निराशा होणार आहे.
View this post on Instagram
चॅनलच्या या मोठ्या बदलाचा भाग म्हणून ‘भाभीजी घर पर हैं 2.0’ ही मालिका येत्या काही दिवसांत बंद होणार आहे. या मालिकेचा शेवटचा भाग 16 एप्रिल 2026 रोजी प्रसारित होण्याची शक्यता आहे. याआधी ही मालिका झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होईल अशी चर्चा होती. परंतु ‘भाभीजी घर पर हैं’ ही मालिका ओटीटीवर स्ट्रीम होण्याऐवजी कायमची बंद होणार आहे.
या मालिकेत अंगुरी भाभीच्या रुपात तब्बल दहा वर्षांनंतर अभिनेत्री शिल्पा शिंदेनं कमबॅक केलं होतं. यात आधी शिल्पाच अंगुरी भाभीची भूमिका साकारत होती. परंतु निर्मात्यांशी काही वाद झाल्यानंतर तिने अचानक ही मालिका सोडली होती. त्यानंतर अभिनेत्री शुभांगी अत्रेनं तिची जागा घेतली होती.
