सोनाली बेंद्रे आणि नवरा गोल्डी प्रचंड अडचणीत! शेतकरी इरेलाच पेटला, थेट कोर्टातच खेचलं; काय आहे प्रकरण?
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या अडचणीत सापडली आहे. तिने मावळ येथे खरेदी केलेल्या जमीनीबाबत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या...

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या लूकमुळे तर कधी तिच्या चित्रपटांमुळे. सध्या सोनाली खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाली आणि तिचा पती गोल्डी बहल यांनी खरेदी केलेल्या जमीनीवरुन वाद झाला आहे. या जमिनीवरुन त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मावळ तालुक्यातील उकसान येथील शेतजमिनीच्या वादावरून बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा पती गोल्डी बेहल अडचणीत सापडले आहेत. स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी संबंधित जमीन ही वडिलोपार्जित कुळ हक्काची असल्याचा दावा केला आहे. कुळकायद्यानुसार १९५७ पूर्वीपासून ताब्यात असलेल्या ३० गुंठे जमिनीवर हक्क असताना, खोट्या कागदपत्रांच्या आधारे हा हक्क डावलून जमीन विकत घेतल्याचा गंभीर आरोप सोनाली बेंद्रे आणि तिचा पती गोल्डी बहलवर करण्य़ात आला आहे.
20 एप्रिल रोजी कोर्टात होणार सुनावणी
तसेच, संबंधित जागेवर बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न आणि कुटुंबीयांना दमदाटी केल्याचाही आरोप आहे.या प्रकरणी आधी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या होत्या, मात्र हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली. सध्या न्यायालयात मनाई आदेशाची मागणी करण्यात आली असून, पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मावळ तालुक्यातील उकसान गावात एकच खळबळ उडाली आहे.
सोनाली बेंद्रेने फेटाळले आरोप
मावळ तालुक्यातील उकसान येथील शेतजमिनीच्या वादात बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बेहल यांच्या बाजूने त्यांच्या वकील राजू शिंदे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. वकील राजू शिंदे यांनी सांगितले की, सोनाली बेंद्रे यांच्या नावावर ही जमीन मुळातच नाही. त्यामुळे या प्रकरणाशी सोनाली बेंद्रे यांचा थेट संबंध नाही. तरीही त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. ८ जून १९६५ रोजी मावळच्या तत्कालीन तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार, केसू शिंदे हे त्या जमिनीचे मालक नसल्याचे स्पष्ट झाले होते. यापूर्वी अनेक वेळा तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी (SDO) स्तरावर अपील करण्यात आले. मात्र, प्रत्येक वेळी निर्णय चंद्रकांत शिंदे यांच्या विरोधातच गेला. ऑक्टोबर २०२५ मध्ये मावळ तहसीलदारांनी चंद्रकांत शिंदे यांची अपील फेटाळली होती. त्यानंतरही त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पुन्हा अपील केले. वकील राजू शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, केवळ पैसे उकळण्याच्या हेतूने हे प्रकरण वारंवार उकरून काढले जात आहे.
