Coolie Movie Review : ड्रामा, ॲक्शन अन् जबरदस्त क्लायमॅक्स.. कसा आहे रजनीकांत यांचा ‘कुली’?
Coolie Movie Review : रजनीकांत, नागार्जुन, आमिर खान, उपेंद्र, सत्यराज आणि श्रुती हासन यांच्या भूमिका असलेला 'कुली' हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहायचा विचार करत असाल तर आधी हा रिव्ह्यू नक्की वाचा..

रजनीकांत यांचं नाव ऐकताच डोळ्यांसमोर सर्वांत आधी त्यांची स्टाइल समोर येते. लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’ या चित्रपटातून पुन्हा एकदा त्यांचा हा अनोखा स्टाइल मोठ्या पडद्यावर पहायला मिळतोय. ‘कुली’ हा चित्रपट प्रेक्षकांना थेट 80 आणि 90 च्या दशकात घेऊन जातो. रजनीकांत यांना फिल्म इंडस्ट्रीत 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त प्रदर्शित झालेला त्यांचा हा चित्रपट प्रत्येक चाहत्यासाठी एक पर्वणीच आहे. ‘कुली’मध्ये रजनीकांत यांचा तोच जुना स्वॅग, अंदाज आणि स्टाइल पहायला मिळतो, जे पाहून अनेकजण लहानाचे मोठे झाले आहेत. हा चित्रपट एकंदरीत कसा आहे, ते जाणून घेऊयात..
कथा
चित्रपटाच्या कथेची सुरुवात एका मोठ्या बंदराने होते, जो सायमन (नागार्जुन) चालवत असतो. या बंदरावर फक्त जहाजांची ये-जा होत नाही, तर तिथे सोनं आणि हिऱ्यांपेक्षाही महाग घड्याळ्यांची तस्करी होते. या संपूर्ण धंद्याला सायमनचा विश्वासू दयाल (सौबिन शाहिर) सांभाळत असतो. या बंदरावर 14,400 मजूर काम करत असतात, ज्यांना ‘कुली’ म्हटलं जातं. दुसरीकडे देवराज ऊर्फ देवा (रजनीकांत) हा एका आलिशान वाड्यात राहत असतो. या वाड्याला त्याने हॉस्टेलसारखं बनवलंय. या हॉस्टेलमध्ये तो विद्यार्थ्यांना आणि गरजूंना कमी किंमतीत राहायला देतो. एकेदिवशी देवाला समजतं की त्याचा जुना मित्र राजशेखरचं (सत्यराज) निधन झालं आहे. जेव्हा तो राजशेखरच्या घरी जातो, तेव्हा त्याची मुलगी प्रिती (श्रुती हासन) त्याचा अपमान करून घरातून बाहेर हाकलते.
शवविच्छेदन अहवालात राजशेखरच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक म्हटलं जातं. परंतु खरा रिपोर्ट जेव्हा देवाच्या हाती लागतो, तेव्हा त्याला धक्काच बसतो. यापुढे काय घडतं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पहावा लागेल.
कसा आहे चित्रपट?
‘कुली’ हा एक धमाकेदार चित्रपट असून थिएटरमधून बाहेर पडताना तुमच्या चेहऱ्यावर हास्य नक्की असेल. यामध्ये अॅक्शन आणि ड्रामा यांचा तडका आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवते. याची कथा कदाचित माहिती असल्यासारखी वाटू शकते, परंतु त्याची मांडणी नव्या पद्धतीने करण्यात आली आहे. शिवाय या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये जबरदस्त ट्विस्ट आहे. ‘कुली’मध्ये आमिर खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे. तर उपेंद्रच्या एण्ट्रीमुळे हा चित्रपट आणखी रोमांचक झाला आहे.
दिग्दर्शक लोकेश कनगराज हा त्याच्या खास स्टाइलसाठी ओळखला जातो. हीच स्टाइल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळते. यात धमाकेदार पार्श्वसंगीत, जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स आणि दमदार कलाकार यांचं परफेक्ट समीकरण पहायला मिळतं. लोकेशने बऱ्याच काळानंतर रजनीकांत यांना अशा अंदाजात दाखवलंय, जे पाहून चाहते खुश होतील.
‘कुली’चा संपूर्ण भार रजनीकांत यांच्याच खांद्यावर आहे. त्यांची स्टाइल, अॅक्शन, डान्स, अभिनय, संवाद आणि प्रत्येक फ्रेम प्रशंसनीय आहे. तर सायमनच्या रुपात नागार्जुन यांनी खतरनाक खलनायक साकारला आहे. अभिनयाच्या बाबतीत नागार्जुन यांनी चांगली टक्कर दिली आहे. दयालच्या भूमिकेतील सौबिन शाहिर विशेष लक्ष वेधून घेतो. तर प्रितीच्या भूमिकेत श्रुती हासननेही चांगलं काम केलंय. भावनिक दृश्यांमध्ये ती अधिक प्रभावशाली वाटते. आमिर खानचा कॅमियो हा चित्रपटातील एक जबरदस्त ट्विस्ट आहे. आमिर आणि रजनीकांत यांना एकाच फ्रेममध्ये पाहून थिएटरमध्ये शिट्ट्या वाजू लागतात. एकंदरीत हा एक मसालापट आहे, ज्याची कथा कदाचित परिचित वाटू शकते. परंतु जर तुम्ही रजनीकांत यांचे चाहते असाल, तर मोठ्या पडद्यावर तुम्हा हा चित्रपट नक्कीच एंजॉय करू शकाल.
