Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’मध्ये दिसणार हा सर्वांत मोठा बदल; आदित्य धरला घ्यावं लागलं नमतं?
येत्या मार्च महिन्यात बहुप्रतिक्षित 'धुरंधर 2' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना मोठा बदल पहायला मिळणार आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 19 मार्च रोजी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये जेव्हा ‘धुरंधर’चा पहिला भाग प्रदर्शित झाला, तेव्हाच त्याच्या सीक्वेलची घोषणा करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच या सीक्वेलचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता प्रदर्शनासाठी अवघा महिना शिल्लक राहिला असताना सीक्वेलविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. ‘धुरंधर 2’मध्ये सर्वांत मोठा बदल करण्यात आला आहे. या बदलाविषयीची माहिती समोर आल्यानंतर दिग्दर्शक आदित्य धरने नमतं घेतलं की काय, अशी चर्चा होत आहे.
‘धुरंधर’ हा चित्रपट त्याच्या रनटाइममुळे प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला होता. रणवीर सिंहचा हा चित्रपट 3 तास 34 मिनिटांचा होता. इतका मोठा चित्रपट प्रेक्षकांना पूर्णवेळ खुर्चीला खिळवून ठेवू शकेल का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्याचं उत्तर सर्वांनाच मिळालं. बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करून या चित्रपटाने बऱ्याच गोष्टी सिद्ध केल्या. अगदी शेवटच्या श्रेयनामावलीपर्यंत प्रेक्षक थिएटरमध्ये थांबल्याचं पहायला मिळालं होतं.
आता सीबीएफसीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ‘धुरंधर 2’ला 9 फेब्रुवारी रोजी प्रमाणपत्र देण्यात आलं. या तपशीलांवरून असं दिसून येतंय की या सीक्वेलची लांबी ही पहिल्या भागापेक्षा थोटी कमी आहे. हा फरक तसा फार मोठा नाही, तो फक्त 6 मिनिटांचा आहे. ‘धुरंधर 2’चा रनटाइम 3 तास 28 मिनिटांचा आहे.
‘धुरंधर’ला सेन्सॉर बोर्डाने ‘अ’ प्रमाणपत्र दिलं होतं. म्हणजेच तो चित्रपट फक्त प्रौढांसाठीच योग्य होता. त्यातील हिंसक दृश्ये अत्यंत क्रूर आणि भयानक पद्धतीने दाखवण्यात आली होती. त्यामुळे त्याला ‘अ’ प्रमाणपत्र मिळणंच योग्य होतं. परंतु ‘धुरंधर 2’मध्ये झालेला मोठा बदल म्हणजे या सीक्वेलला U/A 16+ अशी रेटिंग मिळाली आहे. पहिल्या भागानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागात अधिक हिंसाचार दिसेल असं वाटलं होतं. परंतु या रेटिंगवरून हे स्पष्ट होतंय की सीक्वेलमधील सीन्स पहिल्या भागाइतकी तीव्र किंवा हिंसक नाहीत. पहिल्या भागात दाखवलेल्या हिंसेवरून अनेकांनी टीका केली होती. त्यामुळे दिग्दर्शक आदित्य धरने एक पाऊल मागे घेतलं की काय, अशी चर्चा होत आहे.
