मला फसवलं, सलमानविरोधात कधीच..; गोविंद नामदेव यांच्याकडून ‘काला हिरन’च्या निर्मात्यांची पोलखोल
ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांनी 'काला हिरन'च्या निर्मात्यांची पोलखोल केली आहे. निर्मात्यांनी माझी फसवणूक केली, मला खोटं सांगून माझ्याकडून चित्रपटाचं शूटिंग करून घेतलं, असा आरोप त्यांनी केला आहे.

‘काला हिरन’ या चित्रपटाचा वाद सध्या उच्च न्यायालयात पोहोचला आहे. सलमान खानने या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. अशातच या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा चर्चेत आला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांनी ‘काला हिरन’च्या निर्मात्यांवर धक्कादायक आरोप केले आहेत. या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकारली आहे. मात्र निर्मात्यांनी त्यांची फसवणूक केली असून ते ज्या चित्रपटात काम करत आहेत, त्याबद्दल त्यांना अंधारात ठेवल्याचा आरोप गोविंद नामदेव यांनी केला आहे. ‘अमर उजाला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत गोविंद नामदेव यांनी ‘काला हिरन’च्या निर्मात्यांवर त्यांच्यापासून सत्य लपवल्याचा आरोप केला आहे.
“शूटिंगदरम्यान मला कधीही सांगण्यात आलं नव्हतं की या चित्रपटात सलमान खानसारखं दिसणारं पात्र असेल. मला याची काहीच कल्पना नव्हती आणि आता ट्रेलर पाहिल्यानंतर मला मोठा धक्का बसला आहे,” असं ते म्हणाले. गोविंद नामदेव यांनी सांगितलं की, त्यांना जे काम करायला सांगितलं होतं आणि निर्मात्यांनी त्यांच्याकडून जे करून घेतलं, त्यात खूप फरक होता. ‘काला हिरन’चा ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांना याची जाणीव झाली. गोविंद यांच्या मते या चित्रपटात सलमानसारख्या दिसणाऱ्या एका पात्राला नकारात्मक भूमिकेत दाखवण्यात आलं आहे.
यावेळी गोविंद नामदेव यांनी असंही स्पष्ट केलं की, जर त्यांना आधीच सत्य माहित असतं, तर ते सलमानच्या विरोधात कधीच जाऊ शकले नसते. त्यांनी ‘काला हिरन’ हा चित्रपटच कधी केला नसता. “मी आणि सलमान एकाच इंडस्ट्रीतील आहोत. तो माझा मित्र आहे. मी त्याच्या विरोधात जाऊन असं काही कधीच करणार नाही. जर मला आधीच माहित असतं की चित्रपट अशा प्रकारे सादर केला जाईल, तर मी त्याच वेळी नकार दिला असता. जर मला सत्य माहित असतं, तर मी हा चित्रपट कधीच केला नसता”, असं ते म्हणाले. इतकंच नव्हे तर चित्रपट बनवताना निर्मात्यांनी ‘काला हिरन’ हे नाव वापरलंच नव्हतं, असाही धक्कादायक खुलासा गोविंद नामदेव यांनी केला आहे. उलट ‘संभल’ या नावाने चित्रपट बनवत असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. निर्मात्यांनी त्यांना संभलच्या धार्मिक इतिहासाशी आणि भगवान कल्कींच्या आगमनाशी संबंधित एक कथाही सांगितली होती. पण नंतर संपूर्ण कथाच बदलेल याची त्यांना कल्पना नव्हती.
“मी निर्मात्यांवर विश्वास ठेवून काम केलं, पण माझंच शोषण करण्यात आलं आहे. मलाच अंधाराच ठेवण्यात आलं आहे”, अशा शब्दांत त्यांनी तक्रार केली. दरम्यान सलमान खानने ‘काला हिरन’ या चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
