ना शाहरुख ना सलमान, हा अभिनेता 22000 कोटींची कमाई करूनही ठरला नाही सुपरस्टार
ना शाहरुख ना सलमान, हा अभिनेता आहे भारतातील सर्वात यशस्वी कलाकार, जो 22000 कोटींची कमाई करून देखील ठरला नाही सुपरस्टार.

Bollywood Biggest Star: सध्याच्या काळात एखाद्या अभिनेत्याचं यश प्रामुख्याने त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून मोजलं जातं. हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांचा विषय निघाला की शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान किंवा अक्षय कुमार यांसारख्या सुपरस्टार्सची नावं सर्वप्रथम घेतली जातात. मात्र या सर्वांनाही कमाईच्या बाबतीत मागे टाकणारा एक अभिनेता होता, ज्याने जगभरात हजारो कोटींचा व्यवसाय करणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केलं. तरीही त्याला ‘सुपरस्टार’चा दर्जा मिळाला नाही. हा अभिनेता म्हणजे इरफान खान.
इरफान खान आज आपल्यात नसले तरी त्यांच्या अभिनयाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. त्यांनी केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नाही तर हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला तीन दशकांहून अधिक काळ लाभला आणि या काळात त्यांनी अशा अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम केलं, ज्यांनी जगभरात अब्जावधी डॉलरची कमाई केली.
विशेष म्हणजे, इरफान खान हे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या हॉलिवूड चित्रपटांनी मिळून सुमारे 20 हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे.
‘खान’ सुपरस्टार्सपेक्षा वेगळी ओळख
इरफान खान यांनी केवळ आंतरराष्ट्रीय चित्रपटच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही अनेक उत्कृष्ट भूमिका साकारल्या. त्यांच्या चित्रपटांनी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर जवळपास 1000 कोटी रुपयांची कमाई केली होती.
शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांना हिंदी चित्रपटसृष्टीत मुख्य नायक म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या चित्रपटांनी अनुक्रमे हजारो कोटींचा व्यवसाय केला. मात्र इरफान खान यांची वाटचाल वेगळी होती. त्यांनी अभिनयाच्या जोरावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनयात वास्तववाद, साधेपणा आणि भावनिक खोली दिसून येत असे. त्यामुळे ते केवळ भारतातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांना भावले.
अकाली निधनाने चाहत्यांना धक्का
अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे इरफान खान यांनी वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 2020 मध्ये त्यांचं निधन झालं आणि भारतीय चित्रपटसृष्टीने एक अत्यंत प्रतिभावान अभिनेता गमावला. आजही इरफान खान यांचं नाव घेतलं की अभिनयातील नैसर्गिकता, डोळ्यांतून बोलणाऱ्या भावना आणि जागतिक स्तरावर भारतीय कलाकाराची निर्माण केलेली वेगळी ओळख आठवते.
