शोमध्ये माती खाऊन येता, हे मी खपवून घेणार नाही..; जान्हवी किल्लेकरने रुचिता जामदारला फटकारलं, कारण काय?
'बिग बॉस मराठी'ची माजी स्पर्धक जान्हवी किल्लेकरने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने रुचिता जामदारवर जोरदार टीका केली आहे. कोण आहेस तू? कोण होतीस तू? असा खोचक सवाल तिने रुचितासाठी केला आहे.

कोल्हापूरची रुचिता जामदार नुकतीच ‘बिग बॉस मराठी 6’मधून बाहेर पडली. घराबाहेर पडल्यानंतर तिने अप्रत्यक्षपणे बिग बॉस या शोवर आणि सूत्रसंचालक रितेश देशमुखवर टीका केली. माझ्यासोबत भेदभाव करण्यात आला, मला माझी बाजू कधीच मोकळेपणे मांडण्याची संधी मिळाली नाही, अशी तक्रार तिने केली. यावरून आता ‘बिग बॉस मराठी 5’ची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने जोरदार टीका केली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत जान्हवीने बिग बॉस आणि रितेशच्या विरोधात बोलणाऱ्या स्पर्धकांना सुनावलं आहे. ज्या ताटात जेवलात, त्यातच छिद्रे करत आहात, अशा शब्दांत तिने रुचिताला फटकारलं आहे.
काय म्हणाली जान्हवी किल्लेकर?
“आज मला तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे, आज आपल्या महाराष्ट्रात अनेक कंटेट क्रिएटर्स आहेत, अभिनेते-अभिनेत्री आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांना बिग बॉसच्या घरात जायचं आहे. महाराष्ट्रात असे बरेच लोक आहेत, जे बिग बॉसमध्ये एकदा जाण्यासाठी धडपडत आहेत, रडत आहेत, तडफडत आहेत की प्लीज एकदा तरी आम्हाला बिग बॉसमध्ये घ्या. कारण बिग बॉस हे इतकं मोठं नाव आहे की बिग बॉसच्या घरात जायला लोकं कुठच्याही थराला जाऊ शकतात. कारण बिग बॉस हा खूप मोठा शो आहे आणि त्या शोमध्ये जाण्याचं स्वप्न महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती बघत असतो. ज्यावेळी तुम्हाला एवढ्या मोठ्या शोमध्ये जाण्याची संधी मिळते, तर त्या संधीचं सोनं करायचं सोडून, तुम्ही आतमध्ये एकतर माती खाऊन बाहेर येता. ठीक आहे.. माती खाऊन येता तर येता, पण ज्या शोने तुम्हाला ओळख दिली, ज्या शोने संपूर्ण महाराष्ट्रासमोर तुमचं नाव आणलं, किमान त्या शोला नावं ठेवू नका”, असं ती म्हणाली.
पुढे थेट रुचिताचं नाव घेत ती म्हणाली, “बिग बॉस पक्षपातीपणा करतात, विशेषकरून रितेश देशमुख. रितेश सरांबद्दल कोणीही वाईट बोलायचं नाही. कारण तो व्यक्ती म्हणून खूप चांगला आहे. अर्थात आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की मी कोणाबद्दल बोलतेय. बिग बॉसच्या घरातून जी नुकतीच बाहेर पडली आहे. तिचं नाव घ्यायला हरकत नाही, मी रुचिता जामदारबद्दल बोलतेय. ती आता बिग बॉसच्या विरोधात जे काही बोलतेय, ते खूप चुकीचं आहे. मला असं म्हणायचं आहे की, कोण आहेस तू? कोण होतीस तू? बिग बॉसच्या निर्मात्यांनी आणि क्रिएटर्सनी तुला एक संधी दिली स्वत:ला सिद्ध करण्याची. चुका होतात, बिग बॉसच्या घरात गेल्यावर बऱ्याच गोष्टी बदलतात. बरेच गेम्स चेंज होतात, राग येतो, सगळंच होतं. मीसुद्धा त्या सगळ्या चुका केलेल्या आहेत. मी कोणाला जज करत नाहीये. माझा मुद्दा एवढाच आहे की, आपल्याला ज्या शोने बनवलंय, ज्या शोने नाव दिलंय.. किमान तुम्ही त्या शोबद्दल तरी वाईट बोलू नका. तुम्ही तुमच्या गँगबद्दल, इतर स्पर्धकांबद्दल बोला.. पण तुम्ही बिग बॉस या शोबद्दल नाही बोलू शकत आणि रितेश सरांना तर नाहीच नाही.”
View this post on Instagram
“आता तुम्ही म्हणताय की बिग बॉसने मला चुकीचं दाखवलं. पण बिग बॉसला तुला चुकीचं दाखवून काय मिळणार आहे? जे तू आतमध्ये करणार, ते बिग बॉस दाखवणार. मग याच्याबद्दल जर बोलणं झालं तर, मला तर तक्रारींची यादीच लिहायला पाहिजे. मला त्यांनी वीकेंडच्या वाराला बोलू दिलं नाही, सगळ्यांत जास्त ओरडा खाणारी स्पर्धक मीच होती, पण आजवर मी बिग बॉसला कधी नावं ठेवली नाहीत किंवा रितेश सरांकडे नजर वर करून बघितलं नाही. कारण ते शोचे होस्ट आहेत. हिंदीत एक म्हण आहे की.. जिस थाली में आप खाते हो, उसी में छेद कर रहे हो. हे चुकीचं आहे. मला तिला एवढंच सांगायचं आहे की तू बोल, तुला राग असेल, संताप असेल. ती जे म्हणतेय की मी चांगलं खेळत होते, तर त्यांना ते नको होतं. मीसुद्धा त्या फेजमधून गेले, सगळ्यांत जास्त चुका मीच केल्या आहेत. जेव्हा जेव्हा मला रितेश सरांनी माझ्या चुका निदर्शनास आणून दिल्या, तेव्हा तेव्हा मी माझा गेम बदलला आणि त्यानंतर बिग बॉसनेही माझ्या चांगल्या गोष्टी दाखवल्या. त्यांनी माझी चांगली आणि वाईट दोन्ही बाजू दाखवली. त्यामुळे तुम्ही त्या शोला नावं ठेवू नका,” अशा शब्दांत जान्हवीने तिचा अनुभव सांगितला.
“माझ्यासाठी बिग बॉस हा शो देवासारखा आहे. कारण जान्हवी किल्लेकरने बऱ्याच मालिका केल्या, पण महाराष्ट्रात मी इतकी पोहोचली नव्हते. आज मी जे काही कमावलं आहे, ते मला बिग बॉसने दिलं आहे. त्यामुळे मी या सर्व स्पर्धकांना सांगू इच्छिते की, काहीही बोला पण बिग बॉस या शोच्या विरोधात आणि रितेश सरांविरोधात काही बोललात तर मी खपवून घेणार नाही,” असा थेट इशाराच तिने दिला आहे.
