जितेंद्र जोशी – उपेंद्र लिमयेची जबरदस्त जोडी; फलटण, वाईमध्ये ‘बंधू’च्या शूटिंगला सुरूवात

जितेंद्र जोशी आणि उपेंद्र लिमये हे दोन्ही कसलेले कलाकार पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. आगामी 'बंधू' या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून फलटण आणि वाईमध्ये शूटिंगला सुरुवात झाली आहे. जिथे राम आहे.. तिथे लक्ष्मण तर येणारच, अशी टॅगलाइन या चित्रपटाला देण्यात आली आहे.

जितेंद्र जोशी - उपेंद्र लिमयेची जबरदस्त जोडी; फलटण, वाईमध्ये बंधूच्या शूटिंगला सुरूवात
Jitendra Joshi and Upendra Limaye
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 14, 2024 | 4:41 PM

सान्वी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत ‘बंधू’ या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण फलटण आणि वाईमध्ये धडाक्यात सुरू झालं आहे. चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरणाची सुरूवात करत नुकताच मुहूर्त सोहळा पार पडला. यावेळी दिग्दर्शक, निर्माते यांच्याबरोबर कलाकारही उपस्थित होते. चित्रीकरणाला सुरुवात झाली म्हणजेच आता लवकरात लवकर ‘बंधू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत काही शंका नाही. ‘आटपाडी नाईट्स’, ‘सरला एक कोटी’च्या यशानंतर लेखक – दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांच्याकडून पुन्हा एकदा वेगळा विषय हाताळण्यात आला आहे. ‘बंधू’ या चित्रपटातून प्रेक्षकांना उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी या दोन कसलेल्या कलाकारांची जबरदस्त जोडी पाहायला मिळणार आहे.

ॲनिमल या हिंदी चित्रपटानंतरच्या यशानंतर आता ‘बंधू’ या आगळ्यावेगळ्या चित्रपटातून उपेंद्र लिमये हा एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. जिथे राम आहे.. तिथे लक्ष्मण तर येणारच, असं टॅगलाईन त्याला देण्यात आलं आहे. यावरुनच ही दोन भावांमधील प्रेमाची गोष्ट आहे हे समजतंय.

या चित्रपटाबद्दल सांगताना लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर म्हणाले, “मी नेहमीच सामाजिक आरोग्य सुधारणारे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतो. समाजाच्या आरोग्याचं नुकसान होईल अशा आशयाचे चित्रपट मी हाताळत नाही. याआधी मी पती – पत्नीवर आधारित चित्रपट केले आहेत. तर आता ‘बंधू’ च्या निमित्ताने मी भावाभावांमधील प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.आताच्या सोशल मिडिया आणि स्पर्धात्मक युगामध्ये नाती दूर होत चालली आहेत. त्यामुळे भावाभावांच्या नात्यावर भाष्य करणं मला गरजेचं वाटलं. दुरावलेली नाती प्रेमाच्या ओल्याव्याने कशी जवळ येतात हे ‘बंधू’ या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे.”

या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर असून निर्माती आरती चव्हाण या आहेत. तर कार्यकारी निर्माते विनोद नाईक आहेत. प्रोजेक्ट हेडची जबाबदारी वैभव शिरोळकर यांनी सांभाळली असून सिनेमॅटोग्राफीचं काम हर्षद आत्माराम गायकवाड यांनी केलं आहे. या चित्रपटाला विजय नारायण गावंडे यांचं संगीत आहे. तर गीतरचनेची धुरा गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांनी सांभाळली आहे. कला दिग्दर्शक नितीन गणपत बोरकर हे आहेत.