स्वत:ची पोरं मात्र कॉन्व्हेन्टमध्ये शिकवली…, हिंदी भाषा सक्तीवर किरण मानेंची रोखठोक पोस्ट
Hindi Langauge in Maharashtra School: स्वत:ची पोरं मात्र कॉन्व्हेन्टमध्ये शिकवली..., हिंदी भाषा सक्तीवर किरण मानेंची पोस्ट सध्या तुफान चर्चेत, 'मायबोलीत भेदभाव करणार्यांनी...'

हिंदी भाषेच्या मुद्द्यावर सध्या वातावरण पेटलं आहे. महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा स्वीकार करत मराठी, इंग्रजीसोबत हिंदी भाषादेखील पहिलीपासून सक्तीची करण्यात येईल, असे सांगितलं होतं. नव्या अभ्यासक्रमानुसार, पाचवीपर्यतच्या विद्यर्थ्यांना आता हिंदी शिकावी लागणार आहे. पूर्वी पाचवीपासून असणारा हिंदी विषय आता पहिलीपासून शिकवण्यात येणार असल्यामुळे अनेकांनी तिव्र शब्दांत तिसऱ्या भाषेचा विरोध केला आहे. राजकीय क्षेत्रासह कलाविश्वातून देखील या निर्णयाचा विरोध होत आहे.
अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी देखील फेसबूकवर पोस्ट लिहित विरोध केला आहे. किरण माने म्हणाले, हिंदी सक्तीवर लैच रान पेटलंय… भारी वाटतं हे बघून. तिसरी भाषा म्हणून हिंदीचा भार नकोच. पण त्याचवेळी हा ही विचार करूया की आपल्या मराठीत प्रमाणभाषेच्या सक्तीचं जे जोखड आहे, त्यातून ती कधी मुक्त होणार? आज मराठीप्रेमाचा उमाळा दाटून येऊन हिंदीला विरोध करणारे लै विद्वान अजूनबी बोलीभाषेला ‘गावंढळ’ मानतात त्याचं काय? भाषेला तालेवार करू शकणार्या अनेक मौल्यवान शब्दांचा खजिना उकीरड्यावर फेकून तिला ‘अशुद्ध’ म्हणणं तुम्ही जोपर्यन्त थांबवत नाही तोपर्यन्त तुमच्या हिंदीविरोधाला घंटा किंमत नाही !
…बहुजनांच्या रोजच्या व्यवहारातले, बोलण्या-चालण्यातले शब्द, शब्दप्रयोग हे स्विकारण्यापेक्षा ‘टाकाऊ’ ठरवले जातात. ‘आणि’ म्हणताना आनी, पाणी मागताना ‘पानी’ असा उच्चार आला की नाकं मुरडली जातात. ‘प्रमाण’ वगैरे मानल्या गेलेल्या तथाकथित भाषेनं विटाळ मानल्यामुळं खरी रसरशीत मराठी बोली तिच्यापासून दूर निघून गेली आहे.
…तेच तेच शब्द वर्षानुवर्ष वापरून मराठी प्रमाणभाषा सपक-अळणी झालीय. म्हणून तर आजकाल तरूण पिढी मराठीत इंग्रजी, हिंदी शब्दांचा तडका मारून तिच्यात लज्जत आणायचा प्रयत्न करते. तरूणाईत गाजलेली रिल्स पहा, नव्व्याणऊ टक्के ग्रामीण बोलीभाषेतच असतात. “खुपच छान” म्हणण्यापेक्षा “लई भारी” किंवा “नादखुळा” मध्ये लैच मज्जा हाय. नाटकाचं नांव ‘शुभेच्छा’ असं असतं तर ते काहीतरीच वाटलं असतं, पण ‘ऑल द बेस्ट’ कसं भन्नाट वाटतं.
तथाकथित ‘शुद्ध’ भाषा हळूहळू आचके देत कायमची मरणार आहे. मायबोलीत भेदभाव करणार्यांनी स्वत:ची पोरं मात्र कॉन्व्हेन्टमध्ये शिकवली आहेत. अनेक विद्वानांचे प्रमाणभाषेतील रूक्ष ग्रंथ मराठी माणसांनाच समजत नाहीत. त्यामुळे ते हळूहळू कालबाह्य होणार आहेत. मराठी माणूस साध्या एटीएममध्ये पैसे काढायला गेला तरी वापराची भाषा इंग्लीश निवडतो. कारण त्यातल्या मराठी शब्दांचे अर्थच कळत नाहीत.
आपण आपले विचार मांडताना साध्यासोप्या बोलीभाषेत मांडले तर ते लेखन भावते, मनामेंदूपर्यन्त पोहोचते आणि त्यात आशयघनता असेल तर चिरकाल टिकते… तुकारामाच्या गाथेसारखे ! बहिणाबाईंच्या कविता आणि अण्णाभाऊ साठेंच्या कथाकादंबऱ्या एकदा वाचल्या की काळजात घर करून राहतात कारण त्यात बहुजनांची बोली आहे. त्यामुळं माझ्या भावाबहिणींनो, हिंदीबरोबरच मराठी प्रमाणभाषेच्या सक्तीलाही झुगारून लांब फेकून द्या. …जी पिढ्यानपिढ्यांनी अशुद्ध ठरवली, तीच खरी ‘समृद्ध’ आहे हे मेंदूत कोरून घ्या !… सध्या किरण माने यांची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.