पोटगी, तिसरी व्यक्ती अन् वाद..; मौनी रॉयच्या पतीने अखेर सर्वच स्पष्ट सांगितलं, म्हणाला ‘मी एकदाच काय ते..’
मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या नात्याविषयी, घटस्फोटाविषयी सोशल मीडियावर विविध चर्चा होत आहेत. त्यासंदर्भातील तथ्यहीन बातम्या वाचून अखेर सूरजने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियारने घटस्फोटाबद्दल विविध चर्चा होत असल्याचं पाहून सोशल मीडियावर एकत्र निवेदन जाहीर केलं. या पोस्टमध्ये दोघांनी विभक्त होणार असल्याचं स्पष्ट करत या काळात खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही सोशल मीडियावर मौनी आणि सूरजच्या नात्याबद्दल विविध चर्चा होत आहेत. इतकंच नव्हे तर अभिनेत्री दिशा पटानीसोबत मौनीच्या मैत्रीवरून बरंच ट्रोलिंग केलं जात आहे. या सर्व गोष्टींना वैतागून अखेर सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये भलीमोठी पोस्ट लिहित सर्वच स्पष्ट केलं आहे. पोटगी, तिसरी व्यक्ती आणि वाद.. या सर्वच चर्चांवर त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
सूरज नांबियारची पोस्ट-
‘मौनी आणि माझ्या विभक्त होण्याच्या पार्श्वभूमीवर ज्या तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या अत्यंत वाईट पद्धतीच्या आणि द्वेषपूर्ण आहेत. याविषयी मी एकदाच आणि शेवटचं काय ते स्पष्ट सांगू इच्छितो. इथे कुठलीही पोटगी नाही, कोणताही वाद नाही. यात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचाही दोष किंवा सहभाग नाही. मौनी आणि मी एकमेकांविषयी असलेल्या आदराने आणि एकमेकांच्या भल्याचा विचार करूनच विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय जे काही पसरवलं जातंय, ते सर्व काल्पनिक आणि काही प्रकरणांमध्ये जाणूनबुजून दोन व्यक्तींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, ते फक्त एकटं सोडण्याशिवाय काहीच मागत नाहीयेत,’ असं त्याने म्हटलंय.

या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिलं, ‘मी हे स्पष्टपणे आणि शेवटचं सांगू इच्छितो की आम्हा दोघांविषयी किंवा आमच्यात तिसरी व्यक्ती असल्यावरून जे काही दावे केले जात आहेत, त्यात काहीच सत्य नाही. या प्रकरणात इतरांना ओढणं चुकीचं आहे. खासकरून निर्दोष मित्रमैत्रिणी, ज्यांचा याच्याशी काहीच संबंध नाही. या संपूर्ण काळात मौनी आणि मी अत्यंत आदरपूर्वक वागलो आहोत आणि जे लोक आमच्याबद्दल बातम्या लिहित आहेत, त्यांनीसुद्धा तसाच आदर द्यावा अशी आमची अपेक्षा आहे.’
‘माध्यमांनी अशा कथा सांगितल्या आहेत, ज्या कधी घडल्याच नाहीत. कोणत्याही पडताळणीशिवाय या बातम्या पब्लिश केल्या जात आहेत, जे अत्यंत चुकीचं आहे. याविरोधात मी स्पष्ट आणि थेट आवाज उठवतोय, कारण जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवली जात असेल तर मी शांत बसणारी व्यक्ती नाही. मौनी आणि मी मिळून जे एकत्र निवेदन दिलं आहे, त्यात आम्ही सर्वकाही स्पष्ट केलं आहे, जे आम्हाला सांगणं गरजेचं होतं. त्यामुळे प्रत्येकाने त्याचा आदर करावा आणि शांतपणे आम्हाला आमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी वेळ द्यावा’, अशी विनंती सूरजने पोस्टच्या शेवटी केली आहे.
