परवीन बाबीचा चाहता, फोटो पाहून आला भारतात, बनला बॉलिवूचा खलनायक, अमिताभ-धमेंद्रसोबत केलं काम
परवीन बाबीचा असा एक चाहता जो तिचा फोटो पाहून आला भारतात. येताच बनला बॉलिवूडचा खलनायक, अमिताभ बच्चन आणि धमेंद्र यांच्यासोबतही लढला. कोण आहे तो अभिनेता?

Parveen Babi : हिंदी चित्रपटसृष्टीत 80 आणि 90 च्या दशकात नायक जितका प्रभावी होता, तितकाच खलनायकही धडकी भरवणारा असायचा. त्या काळात एक विदेशी चेहरा वारंवार पडद्यावर दिसायचा. ज्याने आपल्या दमदार शरीरयष्टी आणि अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली. हा अभिनेता म्हणजे बॉब क्रिस्टो.
20 मार्च 1938 रोजी सिडनी येथे जन्मलेल्या बॉब क्रिस्टो यांचे खरे नाव रॉबर्ट जॉन क्रिस्टो होते. ते उच्चशिक्षित सिव्हिल इंजिनिअर होते आणि त्यांचे कुटुंब ग्रीक व जर्मन वंशाचे होते. बालपणातच ते जर्मनी येथे गेले, जिथे त्यांनी शिक्षणासोबतच नाट्यकलेतही रस घेतला. याच काळात त्यांची हेल्गा नावाच्या मुलीसोबत ओळख झाली आणि त्यांनी तिच्याशी विवाह केला. त्यांना तीन मुलेही झाली.
फोटो पाहून आला भारतात
मात्र, त्यांच्या आयुष्यात मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा एका अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेने ते पूर्णपणे खचले आणि त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले.
त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट तेव्हा आला, जेव्हा त्यांनी एका मासिकाच्या मुखपृष्ठावर परवीन बाबीचा फोटो पाहिला. त्या एका फोटोने प्रभावित होऊन त्यांनी सर्व काही सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला. मुंबईत आल्यानंतर त्यांनी परवीन बाबीची भेट घेतली आणि याच भेटीमुळे त्यांच्या करिअरची नवी सुरुवात झाली.
परवीन बाबीच्या मदतीने त्यांना बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली. संजय खान यांनी 1980 साली प्रदर्शित झालेल्या ‘अब्दुल्ला’ या चित्रपटातून त्यांना पहिली मोठी भूमिका दिली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
200 हून अधिक चित्रपटांमध्ये केलं काम
80-90 च्या दशकात बॉब क्रिस्टो हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध विदेशी खलनायक बनले. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. विशेषतः अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे त्यांचे अॅक्शन सीन आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांच्या उंच बांध्यामुळे आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्समुळे ते इतर खलनायकांपेक्षा वेगळे ठरले.
बॉब क्रिस्टो यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही आपली छाप सोडली. चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्यानंतर त्यांनी बेंगळुरू येथे स्थायिक होऊन योग प्रशिक्षक म्हणून नवे आयुष्य सुरू केले. हळूहळू ते चित्रपटसृष्टीपासून दूर गेले आणि साधे जीवन जगू लागले.
