रीलस्टार रोहिणीच्या मृत्यूनंतर दुसरी बाजू समोर; दुसरं लग्न, विस्कटलेली आर्थिक घडी अन् वाद..
निलेशला भेटण्याआधी रोहिणीचं लग्न झालं होतं. घटस्फोटानंतर निलेश आणि रोहिणी भेटले आणि प्रेमात पडले. त्यानंतरच दोघांनी प्रेमविवाह केला. मात्र 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या दोन शाखा सुरू केल्यानंतर दोघांमधील तणाव वाढला होता, अशी चर्चा आहे.

प्रसिद्ध रील स्टार आणि इन्फ्लुएन्सर रोहिणी पाराध्ये हिनं मंगळवारी सोलापुरातील मंगळवेडा तालुक्यातील ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या किचनमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रोहिणी पाराध्ये आणि तिचा पती निलेश पाराध्ये हे इन्स्टाग्रामवर लोकप्रिय होते. त्यांच्या रील्सना भरभरून व्ह्यूज आणि लाइक्स मिळत होते. शिवाय ‘हॉटेल ग्रामपंचायत’चा त्यांचा व्यवसायसुद्धा सुरू होता. मग रोहिणीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबद्दल सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत. रोहिणी फक्त 25 वर्षांची होती. हॉटेल व्यवसायाच्या तणावातून आणि त्यामुळे पतीसोबत होत असलेल्या सततच्या वादाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथं रोहिणी आणि तिचा नवरा निलेश या जोडीने मिळून ‘हॉटेल ग्रामपंचायत’चा व्यवसाय सुरू केला होता. या हॉटेलच्या किचनचं काम स्वत: रोहिणीच पाहत होती. याच किचनमध्ये बसून तिने अनेक रील्ससुद्धा बनवले, ज्यांना सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र 26 मे रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास तिने ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या किचनमध्येच गळफास घेतला.
रोहिणीने निलेशसोबत दुसरं लग्न केलं आहे. या दोघांचा आंतरजातीय प्रेमविवाह असून दोघंही आधी पुण्याला राहत होते. पुण्यातच त्यांनी इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर रील्स, व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद वाढत गेल्यानंतर त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील मूळ गावी जाऊन ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला. हा हॉटेलचा व्यवसायसुद्धा तेजीत सुरू होता. चांगल्या प्रतिसादामुळे रोहिणी आणि निलेश यांनी मंगळवेढा तालुक्यातच दोन नवीन शाखा सुरू केल्या होत्या.
मात्र दोन्ही शाखांचं व्यवस्थापन करणं, आर्थिक घडी बसवणं अशा गोष्टींची कसरत होत होती. त्यातूनच रोहिणी आणि निलेश यांच्यात सतत वाद होऊन तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. रोहिणीने म्हणूनच टोकाचं पाऊल उचललं असावं असं म्हटलं जात आहे. रोहिणीच्या आत्महत्येमागे दुसरं कुठलं वेगळं कारण होतं का, याबाबतही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस अधिक तपास करत आहेत.
