“कपडे काढून माझ्यासमोर बस..”; ‘तारक मेहता..’ फेम अभिनेत्रीकडून साजिद खानची पोलखोल
सीआयडी, तारक मेहता का उल्टा चष्मा, इश्कबाज यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नविना बोले हिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक साजिद खानवर धक्कादायक आरोप केले आहेत.

‘इश्कबाज’ या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नविना बोलेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक साजिद खानवर धक्कादायक आरोप केले आहेत. ऑडिशनच्या बहाण्याने बोलावून साजिद खानने तिला कपडे काढण्यास सांगितल्याचा आरोप नविनाने केला आहे. सुभोजित घोषच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ती या कास्टिंग काऊचच्या घटनेविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. साजिदवर अशा प्रकारचे आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत अनेक अभिनेत्रींनी साजिदवर अशाच पद्धतीचे गंभीर आरोप केले होते.
कास्टिंग काऊचचा अनुभव सांगताना नविना म्हणाली, “एक अत्यंत भयानक माणूस आहे, ज्याला मला पुन्हा कधीच आयुष्यात भेटायचं नाहीये आणि त्याचं नाव साजिद खान आहे. महिलांचा अनादर करण्याच्या बाबतीत त्याने खरोखरच मर्यादा ओलांडल्या आहेत. ‘हे बेबी’ या चित्रपटाच्या कास्टिंगसाठी त्याने मला बोलावलं होतं आणि मी खूपच उत्सुक होते. जेव्हा मी ऑडिशनला गेले, तेव्हा त्याने मला कपडे काढून त्याच्यासमोर अंतर्वस्त्रामध्ये बसण्यास सांगितलं. तू किती कम्फर्टेबल आहेस, हे मला पहायचंय, असं तो म्हणाला होता. ही 2004 आणि 2006 ची घटना आहे.”




साजिदच्या हेतूंबद्दल शंका उपस्थित होताच नविनाने तिथून बाहेर जाण्याचा मार्ग शोधला. याविषयी तिने पुढे सांगितलं, “सुदैवाने इमारतीच्या खाली माझी कोणीतरी प्रतीक्षा करत होतं. साजिदला काय उत्तर द्यावं हेच मला समजत नव्हतं. माझ्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तो म्हणाला.. काय झालं? तू स्टेजवर बिकिनी घालतेस, मग काय समस्या आहे? हे सर्व त्याच्या भाषेत बकवास आहे. त्याला काय सांगावं हे मला कळत नव्हतं. अखेर मी त्याला म्हटलं की जर तुला हेच पहायचं असेल तर मला घरी जाऊन बिकिनी घालावी लागेल आणि मी आता कपडे नाही काढू शकत. कसंबसं मी तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यानंतर त्याने मला कमीत कमी 50 वेळा फोन केला असेल. हे मी वाढवून-चढवून सांगत नाहीये. मी कुठे पोहोचले, मी परत का येत नाहीये.. हे विचारण्यासाठी त्याने मला फोन केले.”
View this post on Instagram
या घटनेच्या वर्षभरानंतर साजिदने पुन्हा नविनाला संपर्क केला होता. त्यावेळी नविना ‘मिसेस इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत भाग घेत होती. “त्याने मला पुन्हा फोन केला आणि म्हणाला, तू काय करतेस, एखाद्या भूमिकेसाठी तू मला भेटायला ये. तेव्हाच मला समजलं की हा माणूस अनेक महिलांना अशाप्रकारे फसवत असणार. त्यामुळेच त्याला हे आठवलंसुद्धा नाही की वर्षभरापूर्वीच त्याने मला फोन करून त्याच्या घरी बोलावलं होतं आणि माझ्याशी अत्यंत वाईट पद्धतीने वागला होता”, असं नविना पुढे म्हणाली.
2018 मध्ये ‘मी टू’ मोहिमेदरम्यान साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. यात कलाकारांसोबत पत्रकार महिलांचाही समावेश होता.