50 वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं ‘सखाराम बाईंडर’ नाटक पुन्हा रंगभूमीवर, ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार ‘लक्ष्मी’
विजय तेंडुलकर यांचं 'सखाराम बाईंडर' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत एक प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मीची भूमिका साकारणार आहे. नाशिकचे कवी प्रकाश होळकर यांच्यामुळे तिला ही भूमिका मिळाल्याचं तिने सांगितलं.

प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर लिखित आणि 50 वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. या नाटकात अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’ची अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. एका मुलाखतीत तिने नाशिकच्या कवीमुळे आपल्याला ही भूमिका कशी मिळाली, याबद्दल तिने सांगितलं.
‘लक्ष्मी’ची व्यक्तिरेखा आणि नाटकामागचा विचार
नेहा जोशीने सांगितलं की, “सखाराम बाईंडर हे नाटक 50 वर्षांपूर्वीचं असलं तरी त्याचा विषय आजही तितकाच महत्त्वाचा आहे. मला या नाटकातील लक्ष्मीची व्यक्तिरेखा खूप भावली. वरकरणी सहनशील आणि कमकुवत वाटणारी लक्ष्मी आतून खूप कणखर आहे. लग्नसंस्थेला मानणारी लक्ष्मी आणि त्या संस्थेच्या पूर्ण विरोधात असलेला सखाराम एकत्र आल्यावर त्यांचं नातं कसं जुळतं, हे नाटकातून पाहायला मिळेल. 50 वर्षांनंतर आपण कलाकृती स्वीकारण्याच्या दृष्टीने किती पुढे आलो आहोत, हेही यानिमित्ताने समजून घेता येईल.”
नाटकाची निर्मिती आणि तांत्रिक बाजू
सुमुख चित्र निर्मित, या नाटकाचे निर्माते मनोहर जगताप आणि कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. नाटकाचं दिग्दर्शन अभिजीत झुंजारराव यांनी केलं आहे. संगीत आशुतोष वाघमारे, नेपथ्य सुमीत पाटील, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा शरद सावंत आणि वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांची आहे. संकेत गुरव यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिलं आहे. नेहाने सांगितलं की, विजय तेंडुलकरांसारख्या सिद्धहस्त नाटककाराच्या संहितेला धक्का लावणं योग्य नाही, त्यामुळे मूळ संहितेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
View this post on Instagram
नाशिकच्या कवीमुळे नेहा जोशीला मिळाली ‘लक्ष्मी’
कवी प्रकाश होळकर यांनी नेहाचं नाव सयाजी शिंदे यांना सुचवलं आणि दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांच्या मनातही तिचं नाव होतं. “सयाजी शिंदे यांच्यासारख्या मोठ्या आणि अनुभवी कलाकारासोबत काम करण्यापूर्वी सुरुवातीला थोडं दडपण येणं स्वाभाविक होतं. पण जेव्हा ते एखादी भूमिका करतात, तेव्हा ते केवळ एक कलाकार म्हणून तुमच्यासमोर येतात. त्यांच्या अभिनयात इतकं समरस होतात की त्यांचं मोठेपण आणि नावाचा लौकिक आपोआप बाजूला सारला जातो. त्यांच्यासोबत काम करताना कलेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा जवळून अनुभवता आला. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं,” असं नेहा म्हणाली.
प्रेक्षकांना आवाहन
नेहाने प्रेक्षकांना हे नाटक पाहण्याचं आवाहन केलं आहे. “आता काळ बदलला आहे आणि कलाकारही वेगळे आहेत. तुम्हाला नाटक आवडेल किंवा नाही, तुमच्या सर्व प्रतिक्रिया आम्हाला कळवा. यामुळे आम्ही विजय तेंडुलकर यांच्या विचारांपर्यंत कितपत पोहोचू शकलो, हे समजून घेण्यास मदत होईल”, असं ती म्हणाली.
