‘आमिर खान ट्रिपल इंजन सरकार चालवत आहेत’, शेखर सुमन यांचा मिश्कील टोला
आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर शेखर सुमन यांची मिश्कील टिप्पणी; 'ट्रिपल इंजिन सरकार' म्हणत लगावले मिश्कील टोले. नेमकं काय म्हणाले?

अभिनेता आणि सूत्रसंचालक शेखर सुमन यांच्या लोकप्रिय ‘शेखर टुनाइट’ या शोमध्ये यावेळी अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर विनोदी शैलीत भाष्य करण्यात आले. आपल्या खास व्यंगात्मक अंदाजात शेखर यांनी आमिरच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि त्यांच्या ‘परफेक्शनिस्ट’ प्रतिमेचा संदर्भ घेत अनेक मिश्कील टोले लगावले.
शोमधील मोनोलॉगमध्ये शेखर सुमन म्हणाले की, राजकारण्यांनी युती कशी टिकवायची आणि नव्या-जुन्या सहकाऱ्यांना सोबत कसे घ्यायचे, हे आमिर खान यांच्याकडून शिकावे. राजकीय पक्षांना डबल इंजिन सरकार चालवणे कठीण जात असताना आमिर खान मात्र ‘ट्रिपल इंजिन सरकार’ यशस्वीपणे चालवत आहेत, असे म्हणत त्यांनी प्रेक्षकांमध्ये हशा पिकवला.
यावेळी त्यांनी आमिरच्या तीन विवाहांची तुलना रेल्वेच्या इंजिन आणि डब्यांशी करत विनोदी उदाहरण दिले. पहिली आणि दुसरी युती तुटल्यानंतर आता तिसरी युती झाली असून, याला आता ‘महायुती’ म्हणायला हरकत नाही, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.
राजकीय आघाड्यांनी आमिर खानकडून शिकावे
शेखर सुमन यांनी पुढे आमिर यांच्या ‘परफेक्शनिस्ट’ प्रतिमेवरही चिमटा काढला. आमिर कोणतेही काम परिपूर्ण होईपर्यंत करत राहतो. त्यामुळेच त्याला परफेक्शनिस्ट म्हटले जाते, असे म्हणत त्यांनी विनोद रंगवला.
याशिवाय, आमिर खानच्या तिसऱ्या विवाहसोहळ्यात त्यांच्या दोन्ही माजी पत्नी, त्यांची मुले आणि नव्या पत्नीची उपस्थिती याचा उल्लेख करत शेखर म्हणाले की, हेच खरे ‘वसुधैव कुटुंबकम’ आहे. नव्या-जुन्या सर्वांना सोबत घेऊन कसे चालायचे, हेही राजकीय आघाड्यांनी आमिर खानकडून शिकावे असं ते म्हणाले.
दरम्यान, आमिर खानने 1986 मध्ये रीना दत्ता, 2005 मध्ये किरण राव यांच्याशी विवाह केला होता. दोन्ही विवाहांचा नंतर घटस्फोट झाला. त्यानंतर 5 जुलै 2026 रोजी त्याने गौरी स्प्रॅट यांच्याशी तिसरा विवाह केला. शेखर सुमन यांच्या या विनोदी मोनोलॉगची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून, अनेकांनी त्याच्या हजरजबाबी शैलीचे कौतुक केले आहे.
