वयाच्या 40व्या वर्षी टीव्ही इंडस्ट्रीमधील अभिनेत्याचे निधन, दोन वर्षांपासून कॅन्सरशी देत होता झुंज
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एका लोकप्रिय अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ही अभिनेत्री उपचारादरम्यान अभिनेत्याच्या सोबत होती.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. आज, वयाच्या 40व्या वर्षी त्यांचा कॅन्सरशी लढा अपयशी ठरला आहे. त्यांचे निधन झाले आहे. सिद्धार्थ यांच्या निधनानंतर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. सिद्धार्थ यांच्या निधनाच्या बातमीने त्यांचे सहकारी, मित्र आणि प्रेक्षक दुःखी झाले आहेत. सिद्धार्थ यांच्या निधनाची पुष्टी अभिनेत्री सीमा जी. नायर यांनी केली आहे.
सीमा गेल्या काही वर्षांपासून सिद्धार्थ यांच्या उपचारादरम्यान सातत्याने त्यांच्यासोबत होत्या. सिद्धार्थ सुमारे दोन वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. सीमा जी. नायर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टमध्ये लिहिले, “सॉरी आशा संपली…” सीमा जी. नायर यांनी पुढे लिहिले की, “लोकप्रिय मालिका अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल आता एक वेदनारहित जगात गेले आहेत… गेल्या दोन वर्षांपासून मी तुमच्यासाठी लढत होते, जेव्हा माझे मन आणि शरीर थकले होते, तेव्हाही तुमचे जीवन वाचवण्यासाठी धावत होते… आज देवाने ठरवले की तुम्हाला आता आणखी त्रास होणार नाही… मी हे सहन करू शकत नाही सिद्धार्थ, मी पूर्णपणे कोलमडून पडले आहे.”
ही बातमी समजताच मल्याळम मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार आणि सहकाऱ्यांनी शोक व्यक्त केला. सर्वांनी त्यांना केवळ एक कलाकार म्हणून नव्हे, तर टीव्ही सेटवर एक आपुकीचा चेहरा म्हणून ओळखले जातात. अभिनेता किशोर सत्या यांनीही श्रद्धांजली देताना सिद्धार्थ यांच्या लढाई आणि उपचारादरम्यान मिळालेल्या सहकार्याची आठवण काढली. किशोर म्हणाले, “एक आणखी कलाकार खूप लवकर आपल्याला सोडून गेला. सिद्धार्थ वेणुगोपाल टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांसाठी एक ओळखीचा चेहरा होते. ते काही काळापासून कॅन्सरशी लढा देत होते. आमच्या प्रिय सीमा जी. नायर त्यांच्या आरोग्याची काळजी घेत होत्या. फिल्म इंडस्ट्रीने नेहमीच अनेक लोकांच्या वैद्यकीय गरजांमध्ये साथ दिली आहे. मी प्रार्थना करतो की सिद्धार्थ यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि सीमा जी. नायर यांच्या दयाळू हृदयाला नमन करतो.”
सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे टीव्ही शो
‘कस्तूरीमान’ आणि ‘भाग्यजठकम’ सारख्या शोमधून ओळख निर्माण केलेल्या सिद्धार्थ यांचा प्रवास छान सुरु होता. त्रिशूरच्या चालाकुडीशी संबंधित सिद्धार्थ यांना कॉलेजच्या दिवसांपासूनच अभिनयाची आवड निर्माण झाली होती आणि ते प्रोफेशनल थिएटरशी देखील जोडले गेले होते. आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी प्रेझेंटर म्हणून केली होती, त्यानंतर निर्माता अरुण घोष यांच्या सहकार्याने ते टीव्ही मालिकांमध्ये आले.
