हृतिक-सुझानने का घेतला घटस्फोट? 12 वर्षांनंतर भावाने सांगितलं कारण; म्हणाला “लोकांना खूप विचित्र..”
हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी 2000 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या 14 वर्षांनंतर 2014 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना रेहान आणि हृधान अशी दोन मुलं आहेत. सुझानचा भाऊ झायेद त्यांच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चा ज्या घटस्फोटाची झाली असेल तर ती अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांची. लग्नाच्या 14 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. सेलिब्रिटींमधील हे सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक होतं. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. परंतु घटस्फोटानंतरही त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली नाही. किंबहुना दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे गेले असून त्यांच्यातील मैत्री कायम ठेवली आहे. आता सुझानचा भाऊ आणि अभिनेता झायेद खान हा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हृतिक आणि बहीण सुझान यांच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. बरेच प्रयत्न केल्यानंतरही काही गोष्टी जुळून येत नाहीत, अशी खंत त्याने बोलून दाखवली.
का घेतला घटस्फोट?
“हे घडायला पाहिजे नव्हतं. परंतु जी गोष्ट एकमेकांसाठी नाही, त्याला धरून बसल्यावर परिस्थिती आणखी वाईट झाली असती. नात्यात दोघांना त्रास होऊ लागतो. हा त्रास कशाला करून घ्यायचा? तुम्हाला मुलं आहेत, ज्यांच्या भविष्याकडे तुम्ही पाहू शकता, त्यांच्या आयुष्यात सहभागी होऊ शकता, त्यांना लहानाचं मोठं होताना पाहू शकता, त्या मुलांना चांगल्या व्यक्तीत परिवर्तन होताना बघू शकता. या सर्व गोष्टींवर त्यांनी लक्ष केंद्रीत केलंय”, असं झायेद ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
याविषयी त्याने पुढे सांगितलं, “घटस्फोट झालाय आणि त्या गोष्टी आता संपल्या आहेत. आता पुढच्या आयुष्यावर लक्ष केंद्रीत करणं आणि स्वत:च स्वत:चा आनंद शोधणं महत्त्वाचं आहे. आमचं कुटुंब सोसायटीच्या किंवा समाजाच्या दबावाखाली येऊन जगणारं नाहीये. अशा गोष्टींबद्दल आम्ही थोडे अधिक समजूतदार आणि थोडे अधिक सुशिक्षित आहोत. मला माहीत आहे की सर्वसाधारणपणे लोकांना हे खूप विचित्र वाटतं. काही तरुण असतात, काही जण स्वत:च दु:खी असतात, काही लोकांना ते समजतच नाही आणि ते ठीक आहे. काही हरकत नाही.”
आयुष्यात पुन्हा प्रेम मिळवण्याबद्दल काय म्हणाला झायेद?
घटस्फोटानंतर हृतिक आणि सुझान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले आहेत. एकीकडे हृतिक हा अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. तर दुसरीकडे सुझान ही अर्सलान गोणीच्या प्रेमात आहे. याविषयी झायेद म्हणाला, “मला असं वाटतं की प्रेम हा खूप व्यापक शब्द आहे. त्यांच्या मनात एकमेकांविषयी असलेला आदर आणि काळजी त्याहूनही अधिक अर्थपूर्ण आहे. त्यांना खूप छान जोडीदार मिळाले आहेत. मला सबा खूप आवडते आणि ती माझ्या लहान बहिणीसारखी आहे.”
“आयुष्य पुढे जातच राहतं. त्यांनी जे काही सहन केलंय, ते मी शब्दांत मांडू शकत नाही. पण ज्याप्रकारे त्यांनी परिस्थिती हाताळली, ज्या प्रकारे ते पुढे गेले आणि आयुष्याच्या या प्रवासात पुन्हा प्रेम शोधत त्यांनी जे काही मिळवलं, त्यामुळे माझा त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला आहे. हे खूप कठीण आहे. शेवटी, मुद्दा काय आहे? तुम्ही विश्वास ठेवू शकाल अशी व्यक्ती सोबत असणं, हे महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ असतो असं मला वाटतं. जर तुमच्या पाठिशी कोणी एक खंबीर व्यक्ती नसेल तर तुम्ही या जगात कसं वावरणार”, अशा प्रश्न झायेदने विचारला आहे.
