इराणची एक घोषणा अन् भारतासाठी 3 आनंदाच्या बातम्या, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या लोकांना होणार फायदा
Good News For India : इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी होर्मुज पूर्णपणे खुला करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे भारताला 3 आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जहाज वाहतूक प्रभावित झाली आहे. कारण युद्धाच्या काळात इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवले होते. त्यामुळे जगभरातील ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. गेल्या सुमारे दीड महिन्यापासून संपूर्ण जगाचे लक्ष होर्मुजकडे लागले होते, कारण जगातील सुमारे 20 टक्के तेल आणि गॅस पुरवठा याच मार्गाने होतो. त्यामुळे भारताचीही चिंता वाढली होती. मात्र आता इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी होर्मुज पूर्णपणे खुला करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे भारताला 3 आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत. यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या लोकांना फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण
इराणने होर्मुज खुला करण्याची घोषणा करताच 8 वाजता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 12% घसरून 83 डॉलर प्रति बॅरलवर आल्या, तर ब्रेंट क्रूडमध्ये 11% पेक्षा जास्त घट होऊन किंमत सुमारे 87 डॉलर प्रति बॅरलपर्यंत आली. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती फेब्रुवारीतील नीचांकी स्तराजवळ पोहोचल्या आहेत. किमती कमी झाल्याने भारताच्या आयात खर्चात घट होईल, परिणामी इंधनाच्या किमती वाढण्याचा धोका कमी झाला आहे. याचा फायदा गल्ली ते दिल्लीपर्यंत होणार आहे.
शेअर बाजार वधारण्याची शक्यता
होर्मुज मार्ग खुला झाल्याने पुरवठा साखळीतील अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात तेजीचे संकेत मिळत आहेत. ही बातमी भारतीय बाजार बंद झाल्यानंतर आली असली तरी लगेचच गिफ्ट निफ्टीमध्ये 2% म्हणजेच 400 अंकांहून अधिक वाढ झाली. यावरून सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी उसली पहायला मिळण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे HPCL, BPCL, IOC, पेंट, टायर आणि विमान वाहतूक क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी होऊ शकते.
सोने आणि चांदीत तेजी
सामान्यतः तणाव कमी झाल्यास सोन्याच्या किमती कमी होतात. मात्र मध्यपूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदार सावध झाले होते आणि त्यांनी सोने-चांदीत गुंतवणूक टाळली होती. आता होर्मुज खुला झाल्याने आणि युद्धाचा धोका कमी झाल्याने गुंतवणूकदार पुन्हा सोने-चांदीकडे वळत आहेत. जागतिक बाजारात सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतात MCX वर चांदी 5% वाढीसह सुमारे 2.61 लाख रुपये प्रति किलो दराने व्यवहार करत आहे, तर सोन्याच्या किमतीत 1.50% वाढ होऊन 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 1.55 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे.
