Pahalgam Attack : पर्यटकांना बंदी, मदरसे ओस, हॉटेल, गेस्ट हॉऊसमध्ये सैन्याने ठोकला तळ, टरकलेल्या PoK मध्ये Emergency
Emergency in PoK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. युद्धाला केव्हाही तोंड फुटू शकते, त्यामुळे या भागात दहशतीचे वातावरण आहे. पाकिस्तानी लष्कराविरोधातही असंतोष धुमसत असल्याचे दिसून येते.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये ( PoK) भारत केव्हा पण हल्ला करण्याची शक्यता आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशात तणाव आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या आठवडाभरापासून यु्द्धाची तयारी सुरू आहे. पाकिस्तानने देशातंर्गत सुद्धा युद्धाची तयारी सुरू केली आहे. सायरन बसवण्यात आले आहे. तर दुसरीकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्य तैनात करण्यात आले आहे. दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये अगोदरच पाकिस्तानी लष्काराविरोधात तीव्र संताप आहे. त्यात भारताकडून हल्ल्याची शक्यता लक्षात घेता गुरूवारी पीओकेमध्ये आपत्कालीन परिस्थिती लागू करण्यात आली. पीओकेच पंतप्रधान चौधरी अनवर उल हक यांनी ही घोषणा केली. सुरक्षेसाठी नीलम खोरे आणि नियंत्रण रेषेजवळ पर्यटनाला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तर मदरशांमध्ये पुढील 10 दिवस सर्व धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.
PoK सरकार दहशतीत
पीओके सरकार भारत केव्हा सुद्धा हल्ला करणार या भीतीने दहशतीत आहे. हल्ला झाल्यास जेवण, औषधी आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची कमतरता पडू नये यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. युद्ध झाल्यास आर्थिक रसद कमी पडू नये यासाठी आपात्कालीन निधी तयार करण्यात आला आहे. जवळपा एक अब्ज रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. तर पाकव्याप्त परिसरातील सर्व हॉटेल, गेस्टहाऊस आणि मंगलकार्यालयांचा ताबा पाकिस्तानी लष्कराने घेतला आहे. या वास्तूंच्या मालकांकडून ते बळजबरीने घेण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर आपण सैन्यासाठी या वस्तू सोडत असल्याचे त्यांच्याकडून वदवून घेण्यात येत आहे.
पर्यटकांना घातली बंदी
गुरुवारी अधिकाऱ्यांनी नीलम खोरे, किशनगंगा नदी परिसर आणि संवेदनशील परिसरात पर्यटनासाठी पूर्णपणे बंदी घातली. अनेक पर्यटकांना मार्बल चेकपोस्टवरूनच परत पाठवण्यात आले. लिपा खोऱ्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ जाण्यास पाकिस्तानी लष्कराने बंदी घातली आहे. तर या भागातील मदरशांना पुढील 10 दिवस कुठालाही धार्मिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर पाकिस्तानमधील कराची आणि लाहोर हवाई क्षेत्र पुढील एक महिना प्रत्येक दिवशी सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
