जगाचं लक्ष वेधणारी बातमी! भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात, या लोकांना ‘अच्छे दिन’ येणार
India US Trade Deal : भारत आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहे. सध्या ही चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, त्यामुळे कराराची घोषणा कधीही होऊ शकते.

गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहे. सध्या ही चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, त्यामुळे कराराची घोषणा कधीही होऊ शकते. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत संकेत दिले आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुप्रतिक्षित द्विपक्षीय व्यापार करार आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे असं अग्रवाल यांनी म्हटलं आहे. मात्र व्यापक मुक्त व्यापार करारासाठी (FTA) थोडा जास्त वेळ वाट पहावी लागू शकते असंही त्यांनी सांगितले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
लहान करार तयार
एका वृत्तवाहिणीशी बोलताना वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी म्हटले की, अमेरिका ही एक मोठी अर्थव्यवस्था असल्याने, व्यापक मुक्त व्यापार करार (FTA) साठी वेळ लागणे स्वाभाविक आहे. मात्र दोन्ही देशांमध्ये सध्या अनेक मुद्द्यांवर एकमत झाले आहे. बऱ्याचशा छोट्या मुद्द्यांवर एकमत झालेले आहे. मात्र संपूर्ण मुक्त व्यापारासाठी अजून काही वेळ लागण्याची अपेक्षा आहे.
सरकारचे लक्ष आता संतुलित व्यापारावर असल्याची माहिती समोर आली आहे. याचा अर्थ भारताला असे व्यापार नियम असे हवे आहेत, ज्याचा दोन्ही देशांना समान फायदा होईल. तसेच गेल्या काही काळापासून अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यामुळे वाद सुरु आहे. यावर बोलताना वाणिज्य सचिव म्हणाले की, मुख्य मुद्दा वस्तूच्या श्रेणीत आहे आणि तो सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
निर्यातदारांसाठी चांगले दिवस येणार
दोन्ही देशांमधील कराराची घोषणा झाल्यानंतर देशाच्या निर्यातीला मोठा फायदा होणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा फायदा होणार आहे. यामुळे निर्यात क्षेत्रात सक्रीय असलेल्या लोकांना थेट फायदा होणार आहे. सध्या जागतिक स्तरावर आर्थिक गोंधळ सुरू आहे, या काळात भारताचा विकास दर 7 टक्क्यांच्या आसपास आहे. करारानंतर यात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, अमेरिकेने अलीकडेच 200 हून अधिक भारतीय कृषी आणि अन्न उत्पादनांना वाढीव शुल्कातून सूट दिली आहे. याचा थेट फायदा चहा, कॉफी, मसाले, काजू आणि प्रक्रिया केलेले अन्न यांच्या व्यापाऱ्यांना होणार आहे. या उत्पादनांवरील कर कमी केल्याने, भारतीय वस्तू अमेरिकन बाजारपेठेत स्वस्त विकल्या जातील, ज्यामुळे मागणी वाढेल, याचा फायदा संबंधित शेतकऱ्यांना होणार आहे.
