Iran US Ceasefire : इराण-अमेरिका युद्धात पाकिस्तान केवळ प्यादं? चीन नव्हे या देशाच्या पडद्यामागून हालचाली? तज्ज्ञांचं विश्लेषण काय ?
इराण-अमेरिका यांच्यातील तात्पुरत्या युद्धविरामामागे अमेरिकेची रणनीती असून, पाकिस्तानने केवळ प्याद्याची भूमिका बजावली, असे लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांचे विश्लेषण आहे. चीनने मध्यस्थी केली असली तरी, अमेरिकेनेच पाकिस्तानला पुढे केल्याचे ढगे म्हणतात. या संघर्षात पाकिस्तानला आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता असून, जागतिक राजकारणातील पडद्यामागील हालचालींवर ढगेंनी प्रकाश टाकला आहे.

अखेर अमेरिका आणि इराण दरम्यान समेट झाला आहे. दोन्ही देशांनी दोन आठवड्यासाठी युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी दोन्ही देशात पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये चर्चा होणार आहे. त्यानंतरच युद्ध थांबले की नाही हे स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या जे तात्पुरते युद्ध थांबले आहे, त्यामागे चीन आणि पाकिस्तानची मोठी भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे. खरोखरच चीन आणि पाकिस्तानची या मागे भूमिका होती का? की या मागे आणखी दुसराच कोणता तरी देश आहे? पडद्यामागे नेमकं काय घडलंय? यावर सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी भाष्य केलं आहे. ढगे यांच्या मते, या युद्धात पाकिस्तानने केवळ पपेटची भूमिका बजावली आहे. त्यामुळे पाकिस्तानला येत्या काळात आर्थिक स्थैर्य येऊ शकतं.
टीव्ही9 मराठीशी सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच चीनने मध्यस्थी केली असली तरी युद्धविराम व्हावं म्हणून अमेरिकेनेच पडद्यामागून पाकिस्तानला पुढे केल्याचं ढगे यांनी म्हटलं आहे. या सगळ्या संघर्षामध्ये पाकिस्तान हे अमेरिकेचे पिल्लू आहे. ही अमेरिकेची रणनीती आहे. काल डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, आम्ही एका रात्रीत इराणला उद्ध्वस्त करू आणि दुसऱ्या बाजूला मध्यस्थी म्हणून पाकिस्तानला अमेरिकेनेच पुढे केले. मध्यस्थांनी सांगितल्यामुळेच आम्ही एक पाऊल मागे हटलो, अशा प्रकारची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी पाकिस्तानला एक प्रकारचे प्यादे म्हणून अमेरिका वापरले आहे. पण ग्राउंड रिॲलिटी अशी आहे की, अशा प्रकारच्या प्रश्नात मध्यस्थी करण्याची पाकिस्तानची कुठलीही कुवत नाही. फक्त मेसेंजर म्हणून चर्चा करणे आणि अमेरिका जे सांगेल तसे वागणे ही पाकिस्तानची भूमिका आहे. पाकिस्तानने त्यांच्या अर्थव्यवस्थेला फायदा होण्यासाठी अमेरिकेचे प्यादे होणे पसंत केले आहे, असं सतीश ढगे म्हणाले.
ते प्रश्न पुढे येणारच
हा युद्धविराम अमेरिकेची माघार आहे की इराणला दिलेला वेळ आहे? असा सवाल ढगे यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन्ही बाजूंनी युद्ध मागे येण्याचा हा प्रयत्न आहे. अमेरिकेने वेळोवेळी आपले उद्दिष्ट बदलले आहेत. मागील आठवड्यात अमेरिकेने इराणविरोधात जबरदस्त लष्करी कारवाई केली. त्यामुळे इराणचे प्रचंड नुकसान झाले. याच अनुषंगाने कुठेतरी आम्ही जिंकलो आहोत असे अमेरिका प्रोजेक्ट करत आहे. मात्र ग्राउंड रिॲलिटी अशी आहे की, इराणमध्ये सत्तांतर करणे अमेरिकेला जमले नाही. दुसऱ्या बाजूला इराणने या काळात कणखर भूमिका घेतली. मात्र इराणचेही प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाची फळी मोठ्या प्रमाणात कमकुवत करण्यात अमेरिका यशस्वी झाली आहे, असं ढगे यांनी सांगितलं.
चीनच्या सांगण्यामुळे इराण युद्धबंदीला तयार झाला आहे. चीन इराणमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पश्चिम आशियातील संघर्षात चीन आणि पाकिस्तान महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असंस सांगतानाच भारताने या युद्धात बघ्याची भूमिका घेणे आवश्यक होते की आणखी आक्रमकतेने मध्यस्थाची भूमिका बजावणे आवश्यक होते? हे महत्त्वाचे प्रश्न निश्चितच पुढे येणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
युद्धाला स्वल्पविराम ?
सुरुवातीला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता दोन आठवड्यांचा हा पॉज या युद्धाला स्वल्पविराम लावण्याचे काम डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. काल डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही इराणची संस्कृती पूर्णतः मिटवून टाकू, अशी विधाने केली होती. हा फक्त दबावतंत्राचा भाग होता. एका बाजूने अशी जबरदस्त विधाने करायची आणि दुश्मन राष्ट्र इराणला तडजोडीच्या टेबलवर आणायचे, आणि चर्चेच्या माध्यमातून जे काही आपल्या पारड्यात पडते ते पाडून घेण्याचा प्रयत्न करायचा. ही ट्रम्प यांची खेळी होती. मात्र ग्राउंड रिअॅलिटी अशी आहे की, अमेरिकेतील जनता इराणसोबतच्या युद्धासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांच्या मताशी सहमत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात घसरत आहे. अमेरिकेत महागाईही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा अमेरिकेवर दबाव येत आहे. त्यामुळे कुठेतरी आम्ही जिंकलोय असे प्रोजेक्ट करून या युद्धातून बाहेर पडण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प मागील काही काळापासून करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून या युद्धाचा स्वल्पविराम दोन आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा स्वल्पविराम आहे. या युद्धाला पूर्णविराम लागलेला नाही. येणाऱ्या काळात काय घटना घडतात हे आपल्याला पाहावे लागेल, असं त्यांनी सांगितलं. अमेरिका जी आक्रमकता दाखवत होती, त्यामुळे संपूर्ण जगावर आणि विशेषतः तेलाच्या किमतीवर जे विपरीत परिणाम होत होते, ते या सीजफायरमुळे कमी झाले आहेत. जगाच्या दृष्टिकोनातून दोन्ही राष्ट्रे चर्चेसाठी तयार होणे ही स्वागतार्ह बाब आहे, असंही ते म्हणाले.
दोन ते तीन महिने लागणार…
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्यामुळे दोन्ही बाजूंनी अडकलेली हजारो जहाजे आता बाहेर पडू शकतात. पूर्णतः मार्ग मोकळा होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. फक्त ही घोषणा केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती सुमारे 20% कमी झालेल्या दिसतील. भविष्यात किमती वाढल्या तरी त्या प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली राहतील. भारताचे जे कंटेनर अडकून पडले होते ते आता या होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतील. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराण एक प्रकारे टोल आकारू शकतो. इराण आणि ओमान या दोन देशांमध्ये या शुल्काची फिफ्टी-फिफ्टी प्रमाणात आकारणी होईल, असंही त्यांनी सांगितलं.
भारताने अधिक…
यावेळी त्यांनी भारताच्या भूमिकेवरही भाष्य केलं. भारताने दोन-तीन गोष्टी चांगल्या केल्या. पश्चिम आशियात असलेल्या एक कोटी भारतीयांच्या सुरक्षिततेविषयी भारताने वेगवेगळ्या देशांशी चर्चा केली. भारताने अपेक्षेपेक्षा अधिक सक्रिय भूमिका घेण्याची गरज होती. कारण सुपरपॉवर म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर यायचे असेल तर बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. जागतिक स्तरावर जे काही प्रश्न आहेत, त्यामध्ये निर्णायक भूमिका घेणे आणि संघर्ष कमी करण्यासाठी काहीतरी महत्त्वाचे योगदान देणे अत्यंत आवश्यक ठरले असते, असं त्यांनी स्पष्ट केलं.
