इथे स्फोटाचे आवाज येतात, आम्हाला…; महाराष्ट्रातील किती पर्यटक दुबईत अडकले? आकडे समोर
इस्रायल-इराण संघर्षाचा फटका दुबईतील भारतीय पर्यटकांना बसला आहे. सध्या महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक दुबईत अडकले असून विमान सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे तिकीट दर गगनाला भिडले आहेत.

इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील भडकलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम जागतिक हवाई वाहतुकीवर झाला आहे. याचा मोठा फटका महाराष्ट्रातून दुबईला गेलेल्या शेकडो पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांना बसला आहे. मध्य पूर्व शहरात तणाव वाढल्यामुळे इराणने दुबईसह काही आखाती देशांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव दुबई, अबुधाबी आणि शारजाह यांसारख्या प्रमुख विमानतळांवरील सर्व उड्डाणे तात्काळ थांबवण्यात आली आहेत. परिणामी पर्यटनासाठी, कार्यक्रमांसाठी किंवा शिक्षणासाठी गेलेले पुणे, मुंबई, सांगली, जळगाव आणि अहिल्यानगरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेकडो प्रवासी सध्या दुबईतील हॉटेल्समध्ये अडकून पडले आहेत. ज्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गिरीकंद ट्रॅव्हल्सचे ५० प्रवासी सुरक्षित
पुण्यातील गिरीकंद ट्रॅव्हल्स एजन्सीचे ५० प्रवासी दुबईत अडकले आहेत. हे सर्व पर्यटक पुणे, अहिल्यानगर, ठाणे आणि सांगली जिल्ह्यातील आहेत. यावेळी गिरीकंदचे एचओडी विनायक वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमचे सर्व ५० प्रवासी सुरक्षित आहेत. त्यांना दुबईतील एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर त्यांना मायदेशी आणले जाईल. राज्य सरकारसोबत देखील एजन्सीचा संपर्क सुरू आहे, असे विनायक वाघचौरे यांनी सांगितले.
विमानाच्या तिकीटांचे दर गगनाला
इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अनेक देशांनी आपली हवाई हद्द बंद केली आहे. परिणामी, दुबई, अबुधाबी आणि शारजाह येथील विमानतळ बंद ठेवावे लागले आहेत. यामुळे मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो आणि पॅरिसला जाणारी रविवार आणि सोमवारची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मुंबई विमानतळावरून तब्बल १२५ उड्डाणे रद्द झाल्याची माहिती आहे. विमाने रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. उरलेल्या काही विमानांचे तिकीट दर चक्क दीड लाखांपर्यंत पोहोचले आहेत.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील किती नागरिक अडकले?
| जिल्हा | अडकलेले नागरिक/विद्यार्थी |
| पुणे | १० पर्यटक + ८४ MBA विद्यार्थी (इंदिरा स्कूल) |
| पिंपरी चिंचवड | ४० ज्येष्ठ नागरिक |
| सांगली (कुपवाड) | ३० पर्यटक |
| जळगाव | ३१ नागरिक |
| ठाणे | ४८ पर्यटक |
| अहिल्यानगर | १२ पर्यटक |
| इतर (लातूर, वाशिम, परभणी) | अनेक प्रवासी |
| एकूण | २५५ |
पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण
सांगली आणि जळगाव जिल्ह्यातील पर्यटकांनी नुकतंच एक भयानक अनुभव सांगितला आहे. हॉटेलच्या परिसरात स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत. दुबई प्रशासन आणि हॉटेल प्रशासनाकडून आम्हाला खोल्यांमध्येच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारत सरकारने आमची सुटका करावी, असे दुबईत अडकलेल्या एका कुटुंबाने सांगितले आहे. यामुळे पर्यटकांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण असून, राज्य आणि केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
