News9 Global Summit : महाराष्ट्रात 16 लाख कोटींची गुंतवणूक, उदय सामंत यांनी दिली माहिती

न्यूज9 ग्लोबल समिटमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राला 16 लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक मिळाल्याची घोषणा केली. इलेक्ट्रिक वाहन, सेमीकंडक्टर, लॉजिस्टिक्स यांसारख्या क्षेत्रांत ही गुंतवणूक झाली आहे. महाराष्ट्रातील मजबूत धोरणे आणि पायाभूत सुविधांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. देशात महाराष्ट्र गुंतवणुकीत अव्वल असून, यामुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे.

News9 Global Summit : महाराष्ट्रात 16 लाख कोटींची गुंतवणूक, उदय सामंत यांनी दिली माहिती
uday samant
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2025 | 7:21 PM

News9 Global Summit : महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अत्यंत चांगलं वातावरण आहे. विश्व आर्थिक मंचावर महाराष्ट्राने इलेक्ट्रिक वाहन, सेमीकंडक्टर, लॉजिस्टिक्स, नवीकरणीय ऊर्जेसहीत विविध क्षेत्रात आघाडीच्या वैश्विक कंपन्यांसोबत 16 लाख कोटींची गुंतवणूक मिळवली आहे. एवढी मोठी गुंतवणूक केवळ गुंतवणूकदारांचा विश्वासावर नव्हे तर धोरणात्मक तत्परता आणि महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा किती मजबूत आहे, हेच दाखवतो, असं महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.

आज जर्मनी येथे आयोजित “News9 Global Summit” कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील वाढत्या गुंतवणुकीकडे जर्मनीचं लक्ष वेधलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत-जर्मनी सहकार्य आणि संवादासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ म्हणून हे News9 Global Summit” उल्लेखनीय ठरणार आहे. MIDC मार्फत परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांसाठी 500 एकर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे, जेणेकरून तेही आपल्या मातृभूमीत उद्योग उभारू शकतील आणि मायदेशी परतू शकतील, असं उदय सामंत म्हणाले.

महाराष्ट्र नंबर वन

आज देशात होणाऱ्या गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे. गेल्या काही वर्षांत, World Economic Forum (WEF) दावोस येथे महाराष्ट्राने 20 लाख हजार कोटींहून अधिक मूल्याच्या सामंजस्य करारांवर (MoU)स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हे महाराष्ट्राच्या उद्योग धोरणांच्या यशाचे आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे मोठे उदाहरण आहे, असं सामंत यांनी सांगितलं.

हा यशस्वी प्रवास सरकारने निर्माण केलेल्या पोषक उद्योग वातावरणामुळे शक्य झाला आहे. उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या विविध योजना, सबसिडी, प्रोत्साहनपर (Incentives) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेगवान निर्णय प्रक्रिया यामुळे आज महाराष्ट्र जगातील आघाडीच्या गुंतवणूक केंद्रांपैकी एक बनला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाइन उपस्थित होते. तसेच माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, नीती आयोगचे सदस्य आणि अर्थतज्ज्ञ अरविंद वीरमानी, टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरून दास आदी मान्यवर उपस्थित होते.