बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची…, राज ठाकरे यांची ती पोस्ट चर्चेत
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट चांगलीच चर्चेमध्ये आली आहे, त्यांनी यामधून नाव न घेता एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे, तसेच भाजपवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

ठाकरे बंधू 11 वर्षांनी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र आल्याचं पहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. यापूर्वी 2014 साली ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र आले होते, त्यानंतर आता 2025 मध्ये तब्बल 11 वर्षांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र आले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना, आता ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. वेगवेगळ्या निमित्तानं ते एकमेकांना भेटत आहेत. आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन असल्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी फेसबुकवर त्यांचा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे, हा फोटो शेअर करताना त्यांनी जी पोस्ट केली आहे, त्यामधून त्यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
‘शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच. पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही.
बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही !
फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन !’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
