Donald Trump : खोटं, खोटं, खोटं, सौदी अरेबियात ट्रम्प सीजफायर बद्दल जे बोलले, ते भारताने सरळ धुडकावलं
Donald Trump : सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी एका जनसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधील युद्ध टाळण्याच श्रेय स्वत:कडे घेतलं. ट्रम्प यांनी सौदी अरेबियाच्या दौऱ्यात हा मुद्दा उपस्थित करुन एक नवीन वाद सुरु केलाय.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर आहेत. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये त्यांनी एका जनसभेला संबोधित केलं. तिथे त्यांनी दावा केला की, भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश्य स्थिती टाळण्यासाठी त्यांनी निर्णायक भूमिका बजावली. ट्रम्प यांनी याला ऐतिहासिक सीजफायर म्हटलं. सोबतच त्यांनी दावा केला की, हा तणाव कमी करण्यासाठी त्यांनी व्यापारीक दबावाचा वापर केला. ही तिसरी वेळ आहे, जेव्हा ट्रम्प यांनी अशा पद्धतीचा दावा सार्वजनिकरित्या केलाय. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याआधीच ट्रम्प यांचा ट्रेड प्रेशरचा हा दावा फेटाळून लावलाय.
“काही दिवसांपूर्वी माझ्या प्रशासनाने भारत आणि पाकिस्तानमधील वाढता संघर्ष रोखण्यासाठी ऐतिहासिक शस्त्रसंधी घडवून आणली. यामध्ये मी व्यापाराचा वापर केला. मी म्हटलं, मित्रांनो, चला करार करु. मिसाईल्सची नको, सुंदर वस्तूंची अदलाबदली करु. दोन्ही देशांचे नेते सशक्त, बुद्धिमान आणि समजदार आहेत. हा संघर्षविराम दीर्घकाळ चालेल अशी मला अपेक्षा आहे” असं डोनाल्ड ट्रम्प सौदी अरेबियातील आपल्या भाषणात म्हणाले.
‘मार्को, उभा रहा, तू…’
भारत-पाकिस्तानमध्ये जे सीजफायर झालं, त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सीनेटर मार्को रुबियो आणि उपराष्ट्रपती जेडी वेंस यांचे आभार मानले. भाषणा दरम्यान त्यांनी रुबियोकडे इशारा केला. “‘मार्को, उभा रहा, तू शानदार काम केलं आहेत. कदाचित आपण दोन्ही देशांना एकत्र डिनरला पाठवू. हा संघर्ष थांबला नसता, तर लाखो लोकांचे प्राण गेले असते. कारण एका छोट्या हल्ल्यापासून सुरु होऊन सतत हे वाढत होतं” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
‘त्यात कोणी बाहेरच्याने दखल देऊ नये’
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलय की, “अमेरिकेसोबत जे बोलणं झालं, त्यात व्यापारिक सौदा आणि अटींवर कुठलीही चर्चा झाली नाही” “काश्मीर मुद्यावर कुठल्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थता मान्य नाही, हे सुद्धा भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केलं. भारत आणि पाकिस्तानमधील हा द्विपक्षीय विषय आहे. त्यात कोणी बाहेरच्याने दखल देऊ नये” असं भारताकडून स्पष्टपणे सांगण्यात आलय.