India-Pakistan War : डबल अटॅकची तयारी, आज पाकिस्तानला बसू शकतो मोठा झटका
India-Pakistan War : भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य स्थिती आहे. पाकिस्तानने ही परिस्थिती निर्माण केली आहे. मागच्या दोन दिवसात भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्य दलांनी आपली क्षमता आणि ताकत दाखवून दिली आहे. आज पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राइक होऊ शकतो.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढत चालला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे प्रत्युत्तर दिलं. भारताच्या कारवाईने पाकिस्तान पार बिथरुन गेला आहे. मात्र, तरीही आपल्या नापाक हरकती, कृत्य पाकिस्तानने बंद केलेली नाही. भारतीय सैन्याने एकामागोमाग एक पाकिस्तानचे हल्ले अयशस्वी केले. भारताने पाकिस्तान विरोधात फक्त सैन्य कारवाईच नाही, तर आर्थिक आघाडीवर सुद्धा त्यांना घेरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी खास रणनिती बनवण्यात आली आहे. 9 मे आजचा दिवस महत्त्वाचा ठरु शकतो. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (IMF) महत्त्वाची बैठक होणार आहे. यात भारत पाकिस्तानचे इरादे हाणून पाडण्याचे पूर्ण प्रयत्न करेल.
9 मे रोजी IMF च कार्यकारी बोर्ड पाकिस्तानला मंजूर केलेल्या 1.3 बिलियन डॉलरच्या नव्या क्लायमेट रेजिलिएंस लोन आणि 7 बिलियन डॉलरच्या बेलआऊट पॅकेजची समीक्षा करेल. पाकिस्तानने पुढच्या हफ्त्यासाठी आवश्यक सुधारणा लागू केल्यात की नाही हे तपासलं जाईल. अशावेळी भारताचाविरोध पाकिस्तानसाठी मोठा झटका ठरु शकतो. पाकिस्तानची 350 बिलियन डॉलरची अर्थव्यवस्था पूर्णपणे IMF च्या कर्जावर अवलंबून आहे. त्यांना 2023 मध्ये 7 बिलियन डॉलरच बेलआउट आणि मार्च 2024 मध्ये 1.3 बिलियन डॉलरच लोन मिळालेलं.
भारत अजून एक स्ट्राइक करणार
भारताने IMF कडे औपचारिकरित्या पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्यतेची समीक्षा करण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी गुरुवारी प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये ब्लूमबर्ग रिपोर्टरने या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. “पाकिस्तान अनेक दशकांपासून भारताविरोधात दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. पाकिस्तान IMF कडून मिळणाऱ्या फंडाचा उपयोग सैन्य क्षमता, आयएसआय आणि लश्कर-ए-तैयबा (LeT) व जैश-ए-मोहम्मद (JeM) सारख्या दहशतवादी संघटनांसाठी करतो. त्यामुळे 9 मे रोजी होणाऱ्या IMF च्या बैठकीत भारताचे कार्यकारी संचालक पाकिस्तानला होणारी ही फंडिग रोखण्याच आवाहन करतील”
फक्त सैन्य कारवाईच केलेली नाही
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात फक्त सैन्य कारवाईच केलेली नाही. आर्थिक आणि कूटनितीक आघाडीवर त्यांना घेरण्याच काम सुरु केलं आहे. भारताने सर्वप्रथम सिंधू जल करार स्थगित केला. त्यानंतर व्यापार रोखला. आता IMF च्या बैठकीत पाकिस्तानच आर्थिक कंबरड मोडण्याची योजना आहे.