चक्क पाकिस्तान भारताच्या मदतीला धावला, भर समुद्रात बंद पडलेल्या जहाजाला मोठी मदत
Pakistan Help India : अरबी समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या एका भारतीय जहाजाच्या चालक दलाला पाकिस्तान नौदलाने मदत केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गेल्या काही काळापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. दोन्ही देशांमधील संबंध तितकेसे चांगले नाहीयेत. त्यामुळे भारताला वारंवार जखमा देणारा पाकिस्तान कधी आपल्या मदतीला येईल, यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. मात्र अशी एक घटना घडली आहे, जिथे पाकिस्तानने आपल्या नेहमीच्या भूमिकेपेक्षा वेगळा मानवीय दृष्टिकोन दाखवला. अरबी समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या एका भारतीय जहाजाच्या चालक दलाला पाकिस्तान नौदलाने मदत केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारतीय जहाज समुद्रात अडकले
समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय ऑफशोर टग आणि सप्लाय वेसल एमव्ही गौतम ओमानहून भारताकडे येत होता. हे जहाज समुद्रात असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि जहाज थांबले. या जहाजावर सहा भारतीय आणि एक इंडोनेशियन नागरिक असे चालक दल होते. या दलाने मुंबईतील मॅरिटाइम रेस्क्यू अँड कोऑर्डिनेशन सेंटरला एसओएस संदेश पाठवला. मुंबई केंद्राने तात्काळ पाकिस्तान अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.
पाकिस्तानी नौदलाची मदत
भारताकडून मदतीची विनंती आल्यानंतर पाकिस्तानी नौदल आणि पाकिस्तान मॅरिटाइम सिक्युरिटी एजन्सी (PMSA) यांनी लगेच कारवाई केली. दोन्ही संस्थांनी चालक दलाला अन्न, वैद्यकीय मदत आणि तांत्रिक सहाय्य पुरवले. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने, चालक दलाला सर्वतोपरी मदत दिली जात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे, आता जहाज सुरक्षित ठिकाणी नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सकारात्मक पाऊल
महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान नौदलाने अरबी समुद्रात अडकलेल्या एका व्यापारी जहाजावरील 18 चालक सदस्यांना वाचवले होते. या दोन्ही घटनांमुळे पाकिस्तान नौदलाच्या मानवीय भूमिकेचे कौतुक केले जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय चालक दलाची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या आपत्कालीन सहकार्याला सकारात्मक पाऊल मानले जात आहे. विशेषतः दोन्ही देशांमध्ये राजकीय आणि लष्करी तणाव असताना, समुद्रात अडकलेल्या भारतीय नाविकांना मदत करणे हा एक महत्त्वाचा मानवी संदेश ठरला आहे.
एमवी गौतमवरील चालक दलाच्या सदस्यांनी मदत मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला. एका भारतीय नाविकाने सांगितले की, ‘समुद्रात एकटे अडकणे खूप भीतीदायक असते, पण मुंबईहून संदेश गेल्यानंतर काही तासांतच पाकिस्तान नौदलाची मदत पोहोचली. त्यांनी अन्न, पाणी आणि आवश्यक औषधे दिली, आता पाकिस्तानच्या या मदतीचे कौतुक होत आहे.
