भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज! अखेर तेलाचं जहाज मुंबईत दाखल; सिग्नल सिस्टीम बंद, लायबेरियाचे झेंडे… काय काय घडलं?
युद्ध परिस्थितीमध्येही सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचे जहाज मुंबईत पोहोचले आहे.

गेल्या १३ दिवसांपासून इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सातत्याने हल्ले सुरू आहेत, तर इराणकडूनही प्रत्युत्तरादाखल हल्ले होत आहेत. या युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) जवळपास बंद झाली आहे. इराणने या मार्गावरून होणाऱ्या जहाजांवर हल्ले करण्याची धमकी दिल्याने आणि काही जहाजांवर हल्ले केल्याने बहुतेक तेल टँकर आणि व्यापारी जहाजांची वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.
याचा परिणाम म्हणून जगभरात इंधनाची टंचाई निर्माण झाली असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अनेक देशांमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र या युद्धाच्या आणि सामुद्रधुनी बंदीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घटना घडली आहे. सौदी अरेबियातून कच्च्या तेलाने भरलेले एक जहाज यशस्वीरित्या होर्मुझची सामुद्रधुनी पार करून मुंबईत दाखल झाले आहे.
हे जहाज लायबेरियाचे ध्वज असलेले शेनलॉन्ग (Shenlong) नावाचे सुएझमॅक्स (Suezmax) प्रकारचे टँकर आहे. यात सौदी अरेबियातील रास तनुरा बंदरातून १ लाख ३५ हजार ३३५ टन कच्चे तेल भरले गेले होते. इराणच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी जहाजाने त्याचे सिग्नल सिस्टीम (AIS) बंद ठेवले होते. हे जहाज आज मुंबई बंदरात सुरक्षितपणे पोहोचले असून, मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. जहाजातील हे कच्चे तेल मुंबई डॉकवरून माहुलमधील रिफायनरीकडे पाठवले जाणार आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या अहवालानुसार, लायबेरियाचे ध्वज असलेले शेनलॉन्ग स्वेजमॅक्स जहाज १ मार्चला सौदी अरेबियातील रास तनुरा बंदरातून कच्चे तेल भरून घेतले आणि दोन दिवसांनंतर, म्हणजे ३ मार्चला रवाना झाले. लॉयड्स लिस्ट इंटेलिजेंस आणि टँकरट्रॅकर्स या मैरीटाइम डेटा फर्मच्या माहितीनुसार, या जहाजाचे शेवटचे सिग्नल लोकेशन ८ मार्चला होर्मुझ सामुद्रधुनीच्या आत मिळाले होते.
होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचा कडक पहारा
हे जहाज भारतात पोहोचले ते अशा वेळी जेव्हा इराणने अनेक व्यापारी जहाजांवर हल्ले केले आहेत आणि चीनकडे जाणाऱ्या जहाजांव्यतिरिक्त इतर कोणत्याही जहाजाला या पाण्याच्या मार्गातून तेल नेण्याची परवानगी न देण्याची धमकी दिली आहे. यामुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यापार मार्गांपैकी एक जवळपास पूर्णपणे बंद झाला आहे. जगातील सुमारे एक पंचमांश (२०%) कच्चे तेल होर्मुझ सामुद्रधुनीतून जाते.
मोठ्या सावधगिरीने मुंबईत पोहोचलेले जहाज
या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले की, मुंबईकडे येणारे हे जहाज अत्यंत सावधगिरीने आणि खबरदारी घेऊन चालले होते. धोकादायक मार्गावरून जाताना शोधले जाण्यापासून वाचण्यासाठी जहाजाने त्याचे ट्रांसपॉन्डर आणि AIS (ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम) बंद करून टाकले होते. यामुळे जहाजाचा मागोवा घेणे अशक्य झाले होते.
