युद्धात भारतही घेणार उडी? इराण-इस्रायल संघर्षात काय घडणार
इराण आणि इस्रायल यांच्यात भयंकर युद्ध चालू झाले आहे. या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. त्यानंतर या युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Iran Isrea War : इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांनी संयुक्तपणे इराणवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये इराणच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनेही यूएई, सौदी अरेबिया यासह इतरही काही महत्त्वाच्या देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. याच युद्धामुळे भविष्यात काय घडू शकते? युद्धाचे नेमका काय पडसाद उमटू शकतात? याबाबत विचारले जात आहे. निवृत्त कर्नल तथा संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी भविष्यात काय काय घडू शकतं? याबाबत माहिती दिली आहे.
अमेरिकेने इराणवर हल्ला का केला?
निवृत्त कर्नल तथा संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन यांच्या मतानुार इराण आणि इस्राईल यांच्यातलं युद्ध आणखी वाढणार आहे. हे युद्ध दीर्घकाळ चालू शकते. अमेरिकेने इराणकडे तीन मागण्या केल्या होत्या, युरेनियमचे उत्पादन थांबवा, 60 टक्क्यांवरील युरेनीयम नष्ट करा, लॅांग रेंज मिसाईलचे उत्पादन थांबव अशा या मागण्या होत्या. परंतु या सर्व मागण्या इस्रायलने धुडकावून लावल्या. त्यामुळे अमेरिकेने इराणची नाकेबंदी चालू केली. अमेरिकेने लढाऊ विमानं इस्राईलमध्ये पाठवली. त्या विमानांनी इराणवर हल्ला केला आहे, असे पटवर्धन यांनी सांगितले. अमेरिकेचे दोन कॅरिअर ग्रुम अरब समुद्रात आणि इराणच्या खाडीत आहे. ३०० च्या वर विमानांनी इराणच्या सहा शहरांवर हल्ला केला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
आपल्यावर महागाईचा फारसा परिणाम नाही
या युद्धाचा जगावर परिणाम होऊ शकतो. गॅस आणि तेलाच्या किमती वाढू शकतात. महागाई वाढू शकते. इस्राईल इराणचा पहिला शत्रू आहे. तर अमेरिका त्यांचा दुसरा शत्रू आहे, असेही मत पटवर्धन यांनी व्यक्त केले. आपल्यावर महागाईचा फारसा परिणाम नाही. आपण तेल इराककडून घेतो. अमेरिका, इराण आणि इस्रायल हे तिघेही भारताचे मित्रदेश आहेत. त्यामुळे भारत या युद्धात तटस्थ राहू शकतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
इराण कुठेही टिकाणार नाही
निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनीसुद्धा या युद्धात भविष्यात काय काय घडू शकतं याचा अंदाज व्यक्त केला आहे. इराणने अशा प्रकारचे हल्ले केले तर हा संघर्ष अधिक चिघळत जाईल आणि अमेरिका आणि इस्रायल हा इराण विरुद्ध अधिक आक्रमक होईल. कोण बरोबर कोण चूक ऐवजी आपण जर फक्त सामर्थ्य पाहिलं तर इस्रायल आणि अमेरिकेच्या सामर्थ्यापुढे इराण कुठेही टिकू शकणार नाही हे सत्य आहे. इराण कितपत या संघर्षाला पुढे घेऊन जातो की चर्चेच्या माध्यमातून अमेरिकेच्या सगळ्या मागण्या मान्य करतो हे आपल्याला पाहावे लागणार आहे, असे मत सतीश ढगे यांनी व्यक्त केले.
