ट्रेनमध्ये आपत्कालीन साखळी खेचली तर काय होते? नियम समजून घ्या आणि जबाबदारीने प्रवास करा
आपत्कालीन साखळी ही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दिलेली सुविधा आहे, ती गैरवापरासाठी नाही. प्रत्येक प्रवाशाने आपल्या कृतीमुळे इतरांचा प्रवास बिघडणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी शालेय स्तरावरच रेल्वे नियमांचं प्राथमिक शिक्षण द्यावं, जेणेकरून पुढील पिढी अधिक जबाबदारीने वागेल.

भारतामध्ये दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. प्रवासादरम्यान ट्रेनच्या डब्यांमध्ये आपल्याला एक लाल रंगाची साखळी दिसते – ही आहे आपत्कालीन साखळी (Emergency Alarm Chain). या साखळीचा उपयोग गंभीर आणि अत्यावश्यक प्रसंगी ट्रेन थांबवण्यासाठी केला जातो. मात्र, अनेक प्रवासी ही साखळी उगाच खेचतात – काही वेळा ट्रेन चुकल्यामुळे, काही वेळा उशिर झाल्याने किंवा अगदी मजा म्हणून! अशा बेजबाबदार कृतीमुळे संपूर्ण रेल्वे व्यवस्थेवर परिणाम होतो.
रेल्वे कायद्यानुसार, रेल्वे अॅक्ट 1989 च्या कलम 141 नुसार ठोस कारणाशिवाय आपत्कालीन साखळी खेचणे हा गंभीर गुन्हा आहे. यासाठी ₹1000 पर्यंत दंड, एक वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ही शिक्षा फक्त कायद्यापुरती मर्यादित नाही, तर अशा कृतीमुळे ट्रेन उशिरा पोहोचते, इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो आणि शेकडो प्रवाशांचा खोळंबा होतो. साखळी कधी खेचावी ?
आपत्कालीन साखळी ही फक्त गंभीर प्रसंगांमध्ये वापरायची असते. उदा.:
1. चालत्या ट्रेनमध्ये आग लागल्यास.
2. अपंग किंवा ज्येष्ठ नागरिक ट्रेनमध्ये चढण्याआधी गाडी सुरू झाल्यास.
3. लहान मूल चुकून प्लॅटफॉर्मवर राहिल्यास
4. अचानक आजारपण झाल्यास
5. चोरीसारखी गंभीर घटना घडल्यास
या प्रसंगांमध्ये साखळी खेचणे आवश्यक ठरते. मात्र याशिवाय साखळी खेचल्यास तो गुन्हा ठरतो.
प्रवाशांनी लक्षात ठेवायच्या काही गोष्टी
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की प्रवाशांनी ट्रेन सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी स्टेशनवर पोहोचावे. उशीर झाल्यामुळे साखळी खेचणे हा पर्याय ठरू नये. प्रवाशांनी साखळी वापरण्याचे नियम समजून घ्यावेत. या बाबत जनजागृती होणेही तितकेच गरजेचे आहे. स्टेशनांवर आणि डब्यांमध्ये माहितीचे फलक, पोस्टर्स, आणि घोषणांद्वारे लोकांमध्ये नियमांची जाणीव निर्माण करता येईल.