काय सांगता? स्वच्छता सर्वेक्षणात राज्यात औरंगाबादचा 6 वा नंबर, देशात 22 वे स्थान!
स्वच्छ अभियानाच्या अंतर्गत सर्वेक्षणात औरंगाबाद शहराचा राज्यात सहावा क्रमांक लागला असून देशात शहराचे स्थान 22 व्या स्थानी आहे. तरीही शहरातील अनेक स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत, अशी प्रतिक्रिया मनपा प्रसासकांनी व्यक्त केली.

औरंगाबादः केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ (Swaccha Bharat Abhiyaan)मध्ये औरंगाबाद शहराने (Aurangabad City) राज्यात चक्क सहावा क्रमांक पटकावला आहे. तर देशातील शहरांच्या यादीत 22 वा क्रमांक मिळवला. गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद शहराने देशातील ‘टॉप 10’ मध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. मागील वर्षी शहर देशपातळीवर 88 व्या स्थानावर होते तर राज्यात 26 व्या स्थानी होते. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी शहराने ही गरूडझेप घेतल्याचे दिसून आल्याने तसेच शहरातील कचऱ्याचे अनेक प्रश्नही अनुत्तरीत असल्याने या निकालाबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘स्वच्छ औरंगाबाद’वर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त
औरंगाबादमध्ये रोज तयार होणाऱ्या 400 टन कचऱ्यावर प्रक्रियेसाठी तीन केंद्रांची आवश्यकता आहे. मात्र शहरात फक्त दोनच केंद्र सुरु आहेत. नारेगाव, पडेगाव, चिकलठाण्यात कचऱ्याचे डोंगर कायम आहेत. पडेगाव डेपोलगतच्या नागरिकांची दुर्गंधीबाबत तक्रार आहे. त्यामुळे पावसाळ्यात चिकलठाणा कचरा डेपोतील लिचड शेतात येते. तसेच शहरातील अजूनही बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचलेले असतात, उघड्या नाल्यांमुळे दुर्गंधी पसरलेली असते. तरीही शहराचा स्वच्छ शहरांमध्ये औरंगाबादचा नंबर कसा लागला, यावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
कसे असते स्वच्छताविषयक सर्वेक्षण?
केंद्र शासन स्वच्छता अभियानाअंतर्गत महापालिकेला सहा हजार गुणांची तपासणी कशी करण्यात येणार, याचा तपशील संबंधित शहरांना पाठवण्यात येतो. यात तीन प्रकारे निकष लावले जातात. पहिल्या प्रकारात महापालिकेने केलेल्या कामांचे कागदोपत्री रेकॉर्ड कितपत अपडेट ठेवले आहे, हे पाहिले जाते. दुसऱ्या प्रकारात थेट केंद्रिय पथकाकडून शौचालये, बाजारपेठ, नागरी वसाहतीची पाहणी करण्यात येते. तिसऱ्या प्रकारात मनपाकडून देण्यात येमाऱ्या सोयी-सुविधांच्या बाबतीत नागरिकांमध्ये किती जागृती केली आहे, हे तपासण्यात येते. औरंगाबाद शहराला राज्य पातळीवर 3 हजार 170 तर राष्ट्रीय पातळीवर 2 हजार 72 गुण मिळाले.
अजून मोठा पल्ला गाठायचाय- मनपा प्रशासक
देशातील ‘टॉप टेन’ च्या यादीत शहराचे नाव येण्यासाठी अजून खूप प्रयत्न करावे लागतील, अशी प्रतिक्रिया मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केली. शहरातील नागरिक, मनपा कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या सहकार्यामुळे सध्याचे यश मिळवणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
इतर बातम्या-
