बुलडाण्याचे पालकमंत्री शहिदांच्या अंत्यसंस्काराला गैरहजर का?, काँग्रेसचा सवाल
बुलडाणा: पुलवामा इथे झालेल्या दहशतवाद्याच्या हल्यात बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आलं. संजय राजपूत आणि नितीन राठोड हे दोन्ही बुलडाण्याचे वीर शहीद झाले. 14 फेब्रुवारीला झालेल्या या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला आहे. या दोन्ही जवानांवर बुलडाण्यात 16 फेब्रुवारीला अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बुलडाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामान्य प्रशासन, पर्यटन, […]
बुलडाणा: पुलवामा इथे झालेल्या दहशतवाद्याच्या हल्यात बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आलं. संजय राजपूत आणि नितीन राठोड हे दोन्ही बुलडाण्याचे वीर शहीद झाले. 14 फेब्रुवारीला झालेल्या या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला आहे. या दोन्ही जवानांवर बुलडाण्यात 16 फेब्रुवारीला अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बुलडाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामान्य प्रशासन, पर्यटन, अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार हे अंत्यसंस्काराला उपस्थित न राहिल्याने काँग्रेसने टीका केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार हे यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत हजेरी लावतात, मग शहिदांच्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्काराला गैर का? असा सवाल काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांनी उपस्थित केला.
पुलवामा दहशतवादी हल्यामुळे संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या आत्मघाती हल्यात 40 जवान शहीद झाले. यामध्ये बुलडाण्याच्या दोन जवानांचाही समावेश होता. लोणार तालुक्यातील चोरपाग्रा येथील नितीन राठोड आणि मलकापूर येथील संजय राजपूत यांना वीरमरण आलं. या दोन्ही जवानांच्या पार्थिवावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संचेती, आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अंत्यसंस्काराच्या दिवशी शनिवारी 16 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. बुलडाणा जिल्ह्यापासून जवळच असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा इथे मोदींची जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार हे सुद्धा उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रम आटोपल्यानंतर नरेंद्र मोदींच्या सभेत उपस्थित असलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे हेलिकॉप्टरने बुलडाण्याला आले. त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन अंत्यसंस्कारालाही उपस्थिती लावली. मात्र मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री येरवार का आले नाहीत? असा प्रश्न उपस्थित करुन काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांनी त्यांचा तीव्र शब्दात निषेध केला.
शिवाय त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 50 लाखांच्या मदतीवर टीका केली. काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात शहिदांच्या कुटुंबीयांना 1 कोटीची मदत आणि परिवारातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिलं आहे, मग महाराष्ट्रतील भाजप सरकारने तशीच घोषणा का केली नाही असा सवाल सानंदा यांनी केला.
संबंधित बातम्या
महाराष्ट्राच्या वीरपुत्रांना अखेरचा सलाम, निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला