फडणवीस सरकारच्या काळात तुमच्या डोक्यावरचं कर्ज अडीच पटीने वाढलं!
महाराष्ट्रावर तब्बल 6 लाख 71 हजार कोटींचं कर्ज आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकावर 54 हजार 400 रुपयांचं कर्ज आहे.

मुंबई : महाराष्ट्रावरील कर्जाचा बोजा हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आतापर्यंत ऐकलेला 4 कोटी 71 लाखांच्या कर्जाचा आकडा प्रत्यक्षात वाढून 6 कोटी 71 लाखांवर गेल्याची माहिती आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात तुमच्या-आमच्या डोक्यावरील कर्जात अडीच पटीने वाढ (Debt on Every Maharashtrian) झाली आहे.
महाराष्ट्रावर तब्बल 6 लाख 71 हजार कोटींचं कर्ज आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास साडेबारा कोटी इतकी आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकावर 54 हजार 400 रुपयांचं कर्ज आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांच्या काळात अडीच पटीने हे कर्ज वाढलं.
2014 मध्ये आघाडी सरकार पायउतार झालं, त्यावेळी महाराष्ट्रावर 2 लाख 69 हजार कोटींचं कर्ज होतं. 2019 पर्यंत त्यात 4 लाख 2 हजार कोटींची भर पडून हा आकडा 6 लाख 71 हजार कोटी रुपयांवर पोहोचला.
आतापर्यंत 4 लाख 71 हजार कोटींच्या कर्जाचीच महाराष्ट्राला कल्पना होती. अर्थसंकल्पातही 4 लाख 71 हजार कोटींचं कर्ज दाखवण्यात आलं होतं. मात्र 2 लाख कोटींचं कर्ज हे ऑफबजेट दाखवण्यात आलं आहे.
सरकारी मालकीच्या कंपन्या आणि महामंडळांकडे 2 लाख कोटींचं कर्ज घेतलंय. या सरकारी कंपन्यांकडूनच हजारो कोटींचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यात समृद्धी महामार्ग, मेट्रो आणि बुलेट ट्रेनचा समावेश आहे.
ठाकरे सरकारची आता कसरत असेल. कारण प्रकल्प पूर्ण करण्याबरोबच इतर विकासकामं आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी यासारखे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घ्यायचे आहेत. मात्र तिजोरीत फारसे पैसेही (Debt on Every Maharashtrian) नाहीत. त्यामुळे ठाकरे सरकारसमोर वाढत्या कर्जाला आळा घालून उत्पन्न वाढवण्याचं आव्हान आहे.