Kolhapur Flood : छातीपर्यंत पाणी, 51 हजार नागरिकांचं स्थलांतर, आर्मी, नेव्ही कोल्हापुरात

| Updated on: Aug 07, 2019 | 5:50 PM

ल्हापूर (Kolhapur Flood)आणि सांगली परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसाने एक दिवसही उघडीप दिली नाही

Kolhapur Flood : छातीपर्यंत पाणी, 51 हजार नागरिकांचं स्थलांतर, आर्मी, नेव्ही कोल्हापुरात
Follow us on

Kolhapur Flood कोल्हापूर/सांगली : कोल्हापूर (Kolhapur Flood)आणि सांगली परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसाने एक दिवसही उघडीप दिली नाही. त्यामुळे नदी-नाले, धरणं तुडुंब झाली आहेत. आधीच पात्रं सोडलेल्या नद्यांमध्ये धरणातील पाणी सोडल्याने पूरस्थिती गंभीर झाली आहे. नागरिकांच्या घरांमध्ये कधीच शिरलेलं पाणी आता घरंही बुडवत आहे. कोल्हापूरची सर्व बाजूंनी नाकेबंदी झाली आहे. कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील पेट्रोल, गॅस संपत आलं आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.

LIVE UPDATE

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाचनंतर पावसाची पुन्हा जोरदार हजेरी, धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत पडू लागला आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये पाणी झपाट्याने वाढू लागले आहे. इचलकरंजी शहरामध्ये शासनाकडून अजून कोणतीही मदत आली नाही. इचलकरंजी नगरपालिका सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस यांनी पूरग्रस्तांना सुरक्षा स्थळी हलवले आहे. जिल्ह्यामध्ये पूरस्थिती बिकट बनली असून काही सुमारे 25 ते 30 खेडे गाव पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर असाच राहिला तर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढून शहरातील पुराचं थैमान वाढण्याची भीती आहे.

Kolhapur Floods महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कोल्हापूर पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी रवाना

बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर दाखल झालं आहे. अद्यापही कोल्हापूर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक नागरी वस्त्यांमध्ये छातीपर्यंत लागेल इतकं पाणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोल्हापूरची पूरस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं आहे. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली.

पंचगंगेची धोक्याची पातळी 43 फूट इतकी होती, मात्र सध्या पाणी पातळी 55 फूट इतकी पोहोचली आहे. त्यामुळे पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प झाला आहे. यापूर्वी 1989 आणि 2005 मध्ये भीषण पूर आला होता, पण त्या पुराचा विक्रम यंदा मोडीत निघाला.  कोल्हापूरला चहूबाजूंनी पाण्याने वेढलं आहे. कोल्हापुरात पावसाने हाहा:कार माजवल्यामुळे पहिल्यांदाज नेव्हीला पाचारण करावं लागलं आहे.

कोल्हापुरातील 204 गावातून 11 हजार 432 कुटुंबांतील 51 हजार 785 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आलं आहे. नौसेनेच्या दोन विमानातून 22 जणांचे पथक मदतीसाठी दाखल झालं.; गोवा कोस्टगार्डचे हेलीकॉप्टर एअरलिफ्टींगसाठी दाखल झाल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

51 हजार लोकांचं स्थलांतर 

कोल्हापुरात काल रात्री लष्कराचे एक पथक दोन बोटीसह तसेच एनडीआरएफचे आणखी एक पथक चार बोटींसह शहरात दाखल झाले. पण महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे अडचण निर्माण झाली. आज पहाटेपासूनच प्रयाग चिखलीकडे चार बोटींसह पथक रवाना झाले तर शहरासाठी दोन बोटींसह मदत देण्यास सुरुवात झाली. आज सकाळी नौसेनेच्या दोन विमानांमधून एका बोटीसह 22 जणांचे पथक शहरात दाखल झाले. त्याचबरोबर गोवा कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर एका बोटीसह दाखल झाले आहे. नौसेनेने आज पुन्हा 14 बोटी देण्याचे मान्य केले आहे. प्राधान्याने प्रयाग-चिखलीकडे मदत पाठविली असून आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टींग सुरु करण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये पूर्णत:, अंशत: पूरबाधीत अशा 204 गावांचा समावेश आहे. काल अखेर या गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांमधील 51 हजार 785 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

दूध संकलन बंद

कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीला महापूर आला आहे. इतर नद्यांचे पाणी वेगात वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडचण येत असल्यामुळे जिल्हा सहकारी दूध  उत्पादक संघाने (गोकुळ ) दूध  संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये कोल्हापूरमधून होणारा गोकुळ दुधाचा तुटवडा झाला आहे.

कोल्हापूरची भीषण पूरस्थिती

  • पुराचे सर्व विक्रम मोडीत, 51 हजार नागरिकांचं स्थलांतर
  • पंचगंगेची धोक्याची पातळी 43 फुटांवर,पण सध्या पाणी 53 फुटांवर
  • पुराचा कोल्हापूरला वेढा, नाकेबंदी झाल्याने अत्यावश्यक वस्तूंच्या तुटवड्याची चिन्हं
  • पुणे-बंगळुरु हायवे ठप्प
  • इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापुरात नौदलाला पाचारण
  • अनेक ठिकाणी छातीपर्यंत पाणी
  • शेकडो गावांचा संपर्क तुटला, 18 गावे पूर्ण बुडाली
  • जिल्ह्यातील सर्व बंधारे पाण्याखाली

बेळगाव पाण्यात

बेळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. बेळगाव शहर पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. खानापूर तालुका, बेळगाव शहर, ओम नगर, समर्थ नगर, महात्मा फुलेनगर पूर्णपणे पाण्याखाली आहे. लहान मुलं, पुरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढलं जात आहे.