दलितांमधील पुढारलेल्या लोकांनी आरक्षण सोडावं: संजय राऊत

| Updated on: Nov 14, 2020 | 2:20 PM

देशात जातीवर आधारीत आरक्षण असू नये ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. देशातील कोणत्याही नागरिकाला आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण दिलं पाहिजे, असं आम्हाला वाटतं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं. (sanjay raut on caste based reservation in shut up ya kunal show)

दलितांमधील पुढारलेल्या लोकांनी आरक्षण सोडावं: संजय राऊत
Follow us on

मुंबई: देशात जातीवर आधारीत आरक्षण असू नये ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. देशातील कोणत्याही नागरिकाला आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण दिलं पाहिजे, असं आम्हाला वाटतं, असं सांगतानाच दलितांना अनेक वर्षांपासून आरक्षण मिळतंय. त्यामुळे आरक्षणामुळे पुढारलेल्या दलितांनी आता आरक्षण सोडलं पाहिजे, असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं. (sanjay raut on caste based reservation in shut up ya kunal show)

प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा यांनी ‘शट अप या कुणाल’ या युट्यूब चॅनेलसाठी संजय राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी राऊत यांनी विविध विषयांवर मतं व्यक्त करतानाच आरक्षणावरही आपली भूमिका व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा निर्णय सरकार घेईल. सध्या हा विषय कोर्टात आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करता येणार नाही, असं राऊत म्हणाले. पण आरक्षणाबाबत सांगायचं तर आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं ही आमची जुनीच भूमिका आहे. जातीच्या आधारावर आरक्षण नको, ही भूमिका आम्हीच मांडली. या देशातील कोणत्याही व्यक्तीला मग तो मुस्लिमही का असेना प्रत्येकाला आर्थिक निकषावरच आरक्षण मिळालं पाहिजे, असं सांगतानाच दलितांनी तर वर्षानुवर्षे आरक्षण घेतलं आणि पुढे गेले. दलितांमधील या पुढारलेल्या आणि आर्थिक सुबत्ता चांगली असलेल्या लोकांनी कधी ना कधी तरी आरक्षण सोडलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

मुस्लिमांच्या व्होटबँकेचं राजकारण नको

यावेळी त्यांनी मुस्लिमांच्या लांगूलचालनाच्या राजकारणावरही टीका केली. देशात मुस्लिमांच्या व्होटबँकेचं राजकारण सुरू आहे. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याची मागणी केली होती. मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेतल्यावर त्यांचे मसिहा म्हणवून घेणारे पळून जातील, असं बाळासाहेब ठाकरे सांगायचे. देशात व्होट बँकेचं राजकारण नसावं. सर्वांना समान अधिकार मिळावा ही आमची भूमिका आहे. पण या देशात सुरुवातीपासूनच लांगूलचालन केलं जात आहे. त्याला आमचा विरोध आहे, असं राऊत म्हणाले.

सेक्युलर हा शब्द शिवी सारखा झालाय

सेक्युलर शब्दावरूनही त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. सेक्युलर हा शब्द सध्या शिवी सारखा झाला आहे. या शब्दाचा देशात चुकीचा वापर केला जात आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिम अशी विभागणी झाली आहे, असं सांगतानाच हिंदुंना शिवी देणं म्हणजेच सेक्युलर असणं आहे का?, असा सवालही त्यांनी केला.

 

संबंधित बातम्या:

कंगना रानौतच म्हणाली होती ‘उखाड लो’, आम्ही केवळ तिच्या इच्छेचा मान राखला: संजय राऊत

भाजपसोबत आमचा भावनिक बंध होता, 25 वर्षांचं नातं तोडताना खूप दु:ख झालं: संजय राऊत

जुनी थडगी उकरली तर तुमच्याच पापाचे सांगाडे दिसतील; राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा

(sanjay raut on caste based reservation in shut up ya kunal show)