Raj Thackeray: रेल्वे भरती आंदोलन प्रकरणावर कोर्टाचा 18 वर्षांनंतर मोठा निर्णय, राज ठाकरे निर्दोष; नेमकं काय घडलं कोर्टात?
Raj Thackeray: 2008 सालच्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज ठाकरे यांना 2008मधील रेल्वे भरती हिंसाचार प्रकरणी निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. पुराव्यांअभावी राज ठाकरे यांच्यासह इतर सहकाऱ्यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. आज निकालाचं वाचन करताना कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यामुळे मनसेमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सन २००८ मध्ये मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये रेल्वे भरतीच्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. या भरती प्रक्रियेत महाराष्ट्राबाहेरील (परप्रांतीय) उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर बोलावण्यात आल्याचा आरोप करत मनसेने ‘मराठी मुळांच्या’ हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलना दरम्यान ठाणे आणि कल्याण परिसरात मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांवर चिथावणीखोर वक्तव्य करणे आणि हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती. आज न्यायालयात निकालाचे वाचन करताना न्यायाधीशांनी राज ठाकरे आणि त्यांच्या इतर मनसे सहकाऱ्यांवरील सर्व आरोप फेटाळून लावले आणि त्यांची निर्दोष मुक्तता करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज ठाकरे आणि मनसे कायदेशीर कचाट्यातून पूर्णपणे मुक्त झाली आहे.
मनसे सैनिकांचा राज्यभर जल्लोष
ठाणे न्यायालयाचा निकाल जाहीर होताच न्यायालयाच्या आवाराबाहेर आणि संपूर्ण महाराष्ट्रात मनसे सैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि पेढे वाटत जल्लोष सुरू केला आहे. “हिंदू जननायक राज ठाकरे अंगार है, बाकी सब भंगार है!” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना मिळालेला हा कायदेशीर दिलासा मनसेला अधिक बळ देणारा ठरेल, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या प्रकरणी या आधीची 13 मे रोजी झाली होती. त्याआधी सुनावणी 11 डिसेंबर 2025 रोजी झाली होती. ज्यामध्ये आपल्याला गुन्हा कबूल नाही, असे राज ठाकरे यांनी कोर्टासमोर सांगितले होते. आपण न्यायालयीन प्रक्रियेला संपूर्णपणे सहकार्य करू असेही राज ठाकरेंनी त्यावेळी कोर्टात म्हटले होते. आता या प्रकरणी पुराव्यांअभावी राज ठाकरे निर्दोष असल्याचा निकाल कोर्टाने दिला आहे.
