Aditya Thackeray Nashik | आदित्य ठाकरेंनी उभारलेला शेंद्रीपाडा येथील पूल वाहून गेला, पुन्हा एकदा पाण्यासाठी महिलांचा जीवघेणा प्रवास सुरूच
Aditya Thackeray Nashik | या लोखंडी पुलाचे उद्धाटन करण्यासाठी स्वत: आदित्य ठाकरे हे शेंद्रीपाडा येथे पोहचले होते. नाशिक जिल्हातील त्र्यंबकजवळ हे शेंद्रीपाडागाव आहे. आता पूल वाहून गेल्याने आताही महिलांना पुराच्या पाण्यातून वाट काढत धोकादायक पध्दतीने प्रवास करावा लागतोयं.

मुंबई : नाशिक (Nashik) जिल्हात मुसळधार पाऊस झालायं. यामुळे नद्यांना पूर आला. मात्र, या पुरामध्ये शेंद्रीपाडा येथील पूल वाहून गेल्याने महिलांना पुन्हा एकदा पाणी आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागतंय. शेंद्रीपाडा येथील महिलांचा पाणी आणतानाचा एक व्हिडीओ (Video) काही महिन्यापूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये महिला लाकडी बल्ल्यांवरून अत्यंत धोकादायक पध्दतीने पाणी आणत होत्या. हा व्हिडीओ आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर ठाकरे यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना लगेचच आदेश देत नवीन लोखंडी पुल बसविण्यास सांगितला होता.
पहिल्याच पावसात वाहून गेला पूल
आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरून युवासेनेचे पदाधिकारी शेंद्रीपाडा येथे पोहचले आणि त्यांनी विलंब न करता शेंद्रीपाड्यात लोखंडी पूल बसून दिला होता. मात्र, यंदा पहिल्याच पावसात हा पूल वाहून गेल्याने अनेकांनी आर्श्चय व्यक्त केले आहे. ज्यावेळेला हा पूल उभारण्याचे काम सुरू होते, त्यावेळी गावकऱ्यांनी पुलाची उंची कमी होत आहे आणि पावसामध्ये पूल पाण्याखाली जाईल असे सांगितले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने पावसात पूल पाण्याखाली गेला आणि चक्क वाहूनही गेला.
पाण्यातून वाट काढत धोकादायक पध्दतीने प्रवास
या लोखंडी पुलाचे उद्धाटन करण्यासाठी स्वत: आदित्य ठाकरे हे शेंद्रीपाडा येथे पोहचले होते. नाशिक जिल्हातील त्र्यंबकजवळ हे शेंद्रीपाडागाव आहे. आता पूल वाहून गेल्याने आताही महिलांना पुराच्या पाण्यातून वाट काढत धोकादायक पध्दतीने प्रवास करावा लागतोयं. आज आदित्य ठाकरे हे नाशिक जिल्हा दाैऱ्यावर आहेत. हा लोखंडी पूल वाहून गेल्याने महिलांना परत एकदा हंडे डोक्यावर घेऊन पाणी आणावे लागत आहे, यावर आता आदित्य ठाकरे काय भूमिका घेतात किंवा काय भाष्य करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
