कृषी अभियांत्रिकीच्या (Agricultural Engineering) विद्यार्थ्यांनी (Students) विविध मागण्यांसाठी कालपासुन राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलीय. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठासमोर शेकडो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झालेत. आज ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस असून महिला दिनी विद्यार्थीनींनी परत द्या, परत द्या आमचा हक्क परत द्या…. फाइट फॉर जस्टिस अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी सेवेच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात अचानक बदल केल्याने कृषी अभियंत्यांवर अन्याय झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केलीय. असंतुलित, अन्यायकारक व तालिबानी नवीन अभ्यासक्रम तत्काळ रद्द करावा, समान गुण भारांकन असावे, कृषि सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम पदाशी संबंधित कर्तव्य व जबाबदाऱ्यांशी संबंधित असावा, अभ्यासक्रम तयार करताना कृषि विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा विचार व्हावा व त्यासंबंधित अभ्यासक्रम असावा, आदी मागण्या करण्यात येत आहेत.