“काहीजण रोज सकाळी येऊन…”, अजित पवारांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले “यांच्या रानातून…”
जामखेड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यांच्या भाषणात गरिबी, विकास, आणि राजकीय टीका यांचा समावेश होता. त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आणि संजय राऊत आणि इतर नेत्यांवर टीका केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी अजित पवारांनी विविध विषयांवर आपले विचार व्यक्त केले. “आपण गरीब कुटुंबात जन्मलो म्हणून निराश होऊ नये. कोणताही कार्यकर्ता लहान किंवा मोठा नसतो, हे सर्वसामान्य जनतेच्या हातात असते. महाराष्ट्राने देशात एक प्रगतीशील राज्य म्हणून ओळख निर्माण केली आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे.” असे अजित पवार म्हणाले.
“आम्ही एकदा हातात घेतलेले काम पूर्ण करतो आणि काम होणार नसेल तर स्पष्टपणे नकार देतो, जरी कोणाला राग आला तरी चालेल. आगामी काळात अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विशेष लक्ष दिले जाईल. सह्याद्रीच्या परिसरात टाटा समूहाने पाण्यावर वीज तयार केली आहे. यंदा पाऊस जास्त पडण्याची शक्यता आहे. इंग्लंडमध्ये पावसाचा अंदाज अचूक येतो, मात्र आपल्याकडे तसे होत नाही. मी हवामान खात्याला याबाबत अनेकदा विचारले आहे.” असेही अजित पवारांनी यावेळी म्हटले.
संजय राऊतांना जबरदस्त टोला
या भाषणादरम्यान अजित पवारांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. आज जग फार पुढे गेलं. आपण उगीचच भांडत असतो. काहीजण रोज सकाळी येऊन कुणाची तरी उणीधुणी काढत बसतात. याचं काय झालं? त्याचं काय झालं? आज अजित पवार काय बोलला? राम शिंदेंचे काय झालं? रोहित पवारांचं काय झालं? उद्धव ठाकरे असं का बोलले? एकनाथ शिंदे राज ठाकरेंकडे कशाला गेले? अरे ते तर तिथे जेवले. तुम्हाला काय करायचंय? आधी तुमचं बघा ना… यांच्या रानातून गाजर गवत निघत नाही आणि हे दुनियेच्या गप्पा मारतात, असा टोला अजित पवारांनी लगावला.
रोहित पवारांबद्दल अजित पवार काय म्हणाले?
यावेळी अजित पवारांनी रोहित पवारांबद्दलही भाष्य केले. “रोहित पवार माझ्यासोबत असताना त्यांना किती निधी दिला याबद्दल माहिती घ्या. आता ते माझ्यासोबत नाहीत. एमआयडीसी आणण्याबद्दल अनेकजण म्हणाले, पण ती आणली का?” असा सवालही त्यांनी केला. “आता राम शिंदे सभापती झाले आहेत, त्यामुळे एमआयडीसी आणावी लागेल,” असेही अजित पवारांनी म्हटले. जामखेड शहरातील रस्त्यांसाठी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.