ते फक्त कव्हर पाहतात, प्रस्तावना वाचली असती तरी…संजय गायकवाड यांना अंबादास दानवेंनी डिवचलं!
आमदार अंबादास दानवे यांनी संजय गायकवाड यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी संजय गायकवाड यांना पोलिसांनी अगोदरच बेड्या ठोकायला हव्या होत्या, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर : आमदार संजय गायकवाड गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता? या पुस्तकावर आक्षेप घेतला होता. या पुस्तकात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे, असा दावा केला होता. तसेच या पुस्तकाचे वितरण करणाऱ्या प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली होती. शिवीगाळ करण्याचे हे प्रकरण राज्यभरात चर्चेत आल्यानंतर त्यांनी नंतर दिलगीरीही व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा संजय गायकवाड यांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले दगलबाजी शिवाजी तसे शिवाजी कोण होता या पुस्तकांवर बंदी घालण्याचा पुनरुच्चार केल आहे. मी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान गायकवाड यांच्या या भूमिकेनंतर आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. यावरच आता आमदार तथा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गायकवाड यांच्यावर दानवे यांनी सडकून टीका केली आहे. ते छत्रपती संभाजीनगरात टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
त्यांनी प्रस्तावना जरी वाचली असती तरी…
संजय गायकवाड हे फक्त कव्हर तेच बघतात. पुस्तकाच्या आतमध्ये काय आहे ते बघत नाहीत आणि वाचतही नाहीत. फक्त कव्हर पेज बघून प्रतिक्रिया ते प्रतिक्रिया देतात. पुस्तकाच्या आत काय लिहिलेलं आहे. पुस्तकात काय भूमिका मांडण्यात आलेली आहे, हे त्यांना माहिती नाही. गायकवाड यांनी किमान त्या दोन्ही पुस्तकांची प्रस्तावना जरी वाचली असती तरी त्या पुस्तकाचा अर्थ कळाला असता. गायकवाड यांना प्रबोधनकार यांनी काय विचार मांडले ते काहीही माहिती नाही, अशा तिखट शब्दांत दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.
गायकवाड यांना बेड्या ठोकायला पाहिजे होत्या
संजय गायकवाड यांची लवकरच या प्रकरणात चौकशी होऊ शकते. तशी परवानगी न्यायालयाने दिली आहे. यावर बोलतान खरं तर या निर्णयाला थोडा उशीरच जाला. आतापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल करून गायकवाड यांना बेड्या ठोकायला पाहिजे होत्या. पोलीस सत्ताधाऱ्यांचे बटीक बनले आहेत. त्यामुळे त्यांना शिवाजी महाराजांविषयी कोण बोलतं, पुस्तकाविषयी कोण काय बोलतं. त्याच्याशी काही देणं घेणं नाही, अशी टीका गायकवाड यांनी केली.
शिंदेंचा पक्ष नसून ती एक गँग
निधिवाटपावरून शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी खदखद व्यक्त केली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी सत्तार यांच्यासोबत निधीवाटपात दुजाभाव केल्याचा दावा केला जातोय. यावरही दानवे यांनी शेलक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. खरंतर शिंदेंचा पक्ष हा पक्षच नाही. ती शिंदे यांची गॅंग आहे. त्याच्यामुळे त्याला पक्ष म्हणणं चूक आहे. त्या गॅंगमध्ये गॅंगवॉर होत असतं. तसंच गँगवार मला वाटतं सत्तार आणि शिरसाट यांच्यात होत असेल, असं दानवे म्हणाले. तसेच शिरसाट यांनी निधी देताना सत्तार यांच्यासोबत दुजाभाव भाव केला आहे आणि तो सगळ्यांसोबत केला आहे, असंही मत दानवे यांनी व्यक्त केलं.
