दोन वर्ष शरीरसुख उपभोगलं, पण लग्नाची वेळ येताच त्याने… बीड हादरले, नेमकं काय घडल?
अंबाजोगाईत २८ वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचार करण्यात आले. धर्मांतराचा दबाव आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सलमान पठाणवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरू आहे.

बीड जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाई शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय पीडित महिलेला लग्नाचे खोटे स्वप्न दाखवून तिच्यावर दोन वर्षांपासून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ शारीरिक शोषणच नव्हे, तर लग्नासाठी धर्मांतराची अट घालून पीडितेला धमकावण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही मूळची लातूर जिल्ह्यातील रहिवासी असून ती सध्या अंबाजोगाई येथे वास्तव्यास आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी तिची ओळख आरोपी सलमान पठाण याच्याशी झाली. सलमानने तिला विवाहाचे वचन दिले आणि तिच्या असहायतेचा फायदा घेत तिला आपल्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने गेल्या दोन वर्षांपासून पीडितेवर वारंवार शारीरिक अत्याचार केले.
काही काळानंतर जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा सलमान पठाणने आपली भूमिका बदलली. त्याने स्पष्टपणे सांगितले की, जर तुला माझ्याशी लग्न करायचे असेल, तर तुला आधी मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल. धर्मांतराच्या या दबावामुळे पीडित महिला हादरून गेली. तिने याला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर आरोपीने तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तुला काय करायचे ते कर, मी तुला सोडणार नाही असे म्हणत त्याने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली.
नवीन कलमांनुसार गुन्हा नोंदवला
या प्रकारामुळे पीडितेने अखेर हिंमत एकवटून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पीडितेच्या तक्रारीवरून अंबाजोगाई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) नवीन कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. कलम ६९ विवाहाचे खोटे आश्वासन देऊन संमती मिळवणे आणि शारीरिक संबंध ठेवणे, कलम ३५२ शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून केलेला अपमान, कलम ३५१ (२) गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे, या कलमातंर्गत त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सध्या आरोपी सलमान पठाण हा फरार आहे. त्यासोबतच शहर पोलीस त्याचे धागेदोरे शोधण्यासाठी कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा आणि धर्मांतरासाठी होणाऱ्या छळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
