यूपीच्या निवडणुकीमुळे मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर, अमित ठाकरेंची फडणवीसांवर टीका!
राहुल गांधी यांचा कार्यक्रम उत्तम झाला. असे राहुल गांधी निवडणुकीत दिसले असते तर आम्ही त्यांच्या सोबत गेलो असतो, असं मोठं विधान त्यांनी केलं.

Amit Thackeray : राज्य सरकारने अमाराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी एका वर्षाची मुदत दिली आहे. वर्षभरात कोणावरही कारवाई केली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च याबाबत माहिती दिली आहे. या निर्णयाचे अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी स्वागत केले आहे. मनसेने मात्र या निर्णयावर आक्षेप व्यक्त केलाय. आणखी दहा पंधरा वर्षे मराठी भाषा शिकण्याची मुदत द्या, शब्दात मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय. तसेच आगामी काळात उत्तर प्रदेशात निवडणूक होणार आहे. हीच निवडणूक लक्षात घेऊन फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे, असा आरोप अमित ठाकरे यांनी केलाय. ते नागपुरात बोलत होते.
सरकारने कुठेतरी एका भूमिकेवर ठाम राहायला हवे
आणखी दहा-पंधरा वर्षे मराठी शिकण्यासाठी मुदत द्या. आम्हाला तुमची मराठीबद्दलची आपुलकी समजली. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका येणार आहेत. म्हणूनच ही मुदत देण्यात आली. सरकारने कुठेतरी एका भूमिकेवर ठाम राहायला हवे. मला हे आवडलेले नाही, अशी नाराजी अमित ठाकरेंनी व्यक्त केली.
एवढं शिकायला एक वर्ष लागतं का
रिक्षा-टॅक्सी चालकांना फार काही मराठी शिकायची नाहीये. डावीकडे जायचे, उजवीकडे जायचे..ओटीपी काय, एवढं शिकायला एक वर्ष लागतं का. कुठल्यातरी फसव्या निवडणुकीसाठी मराठी शिकण्यासाठी ही मुदत देण्यात आली आहे, असा आरोप अमित ठाकरे यांनी केला.
भाजपाचं प्रत्युत्तर
अमित ठाकरेंनी केलेल्या आरोपानंतर भाजपाचे नगरसेवक नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरे तुमचा नागरिकशास्त्राचा अभ्यास कच्चा आहे. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात हे आधी समजून घ्या. तुमच्या पक्षाची काय अवस्था झाली हे महाराष्ट्र पाहतो आहे. मुख्यमंत्री घरात बसून पक्ष वाऱ्यावर सोडणारे नाहीत. यूपीच्या निवडणुकीची चिंता करून नका. आधी आपल्या मतदारसंघातील पराभवाचं कारण शोधा, असा हल्लाबोल नवनाथ बन यांनी केलाय. आता मनसे याला प्रत्युत्तर काय देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.