Amit Thackeray : शून्य… हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत… म्युझिकल नखरे थांबवा; अमित ठाकरे यांची पोस्ट चर्चेत
मुलुंड मेट्रो दुर्घटनेनंतर अमित ठाकरे यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सामान्य मुंबईकरांच्या जीवाचे मोल शून्य झाल्याचे ते म्हणाले. निकृष्ट कामामुळे लोकांचा बळी जात असताना सरकारची प्राथमिकता इव्हेंटबाजी आहे. परदेशात जबाबदारी स्वीकारली जाते, पण आपल्याकडे 5 लाखांची भरपाई देऊन नागरिकांच्या दुःखाची अवहेलना केली जाते, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुलुंड येथे मेट्रोचा पिलर कोसळून एक जण ठार झाला आहे. ऐन गर्दीच्यावेळी पिलरचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामुळे मेट्रोच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच मृताच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये भरपाई देण्यात आली आहे. मात्र, या दुर्घटनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी एक पोस्ट करून सरकारवर हल्लाबोलच केला आहे. तसेच मुंबईतील नागरिकांची किंमत शून्य झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
अमित ठाकरे यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी…
मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला. हा ‘अपघात’ नाही, तर प्रशासनाने केलेला ‘खून’ आहे! निकृष्ट दर्जाचं काम, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून केलेला ‘जुगाड’ आणि वारंवार ताकीद देऊनही झालेलं दुर्लक्ष… याची जबाबदारी कोण घेणार?
एकीकडे सरकारच्या हलगर्जीपणामुळे सामान्य मुंबईकरांच्या डोक्यावर मृत्यूचे स्लॅब कोसळत असताना, दुसरीकडे सरकार कोस्टल रोडवर गाणी वाजवणारे रस्ते बनवून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे. जपानची नक्कल करताना सरकार हे विसरतंय की तिथल्या जनतेला ‘जिविताची हमी’ आणि सर्व ‘मूलभूत सोयी’ मिळाल्या आहेत; आपल्याकडे घराबाहेर गेलेला माणूस जिवंत घरी परतेल की नाही याची खात्री नसताना हे बालिश हट्ट कशासाठी? प्रशासनाचा प्राधान्यक्रम नक्की काय आहे? ज्या गोष्टींची गरज नाही तिथे कोट्यवधी रुपये उधळायचे आणि जिथे लोकांच्या जिवाचा प्रश्न आहे तिथे मात्र रीतसर दुर्लक्ष करायचं?
दुर्दैवाने, हा काही पहिलाच ‘अपघात’ नाही. अशा अनेक घटना मुंबईकरांच्या जीवावर बेतल्या आहेत. कधी पूल कोसळतो, कधी होर्डिंग तर कधी बांधकामाचे स्लॅब अंगावर पडून निष्पाप लोकांचे प्राण जातात. जास्तीत जास्त चौकशीचे आदेश दिले जातात, पण परिस्थिती बदलत नाही. अनियंत्रित गर्दीमुळे होणारे रेल्वे अपघात, निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे लोकांचे जाणारे प्राण याची तर सरकार दरबारी दखलही घेतली जात नाही!
धक्कादायक बाब म्हणजे, मुलुंड प्रकरणी कंत्राटदाराला ६ कोटींचा दंड होतो, पण ज्या कुटुंबाचा आधार गेला त्यांना फक्त ५ लाखांची शुल्लक मदत? एखाद्या कुटुंबाची राखरांगोळी झाल्यावर त्यांच्या दुःखाची अशी ‘शून्यात’ गणना करताना सरकारला लाज कशी वाटत नाही?
नुकतीच अमेरिकेतील एका अपघाताची बातमी आपण वाचली. तिथल्या प्रशासनाच्या चुकीमुळे एका भारतीय मुलीचा मृत्यू झाला, तेव्हा तिथल्या सिस्टीमने जबाबदारी स्वीकारून कोट्यवधींची भरपाई दिली. प्रगत राष्ट्रांमध्ये माणसाच्या जिवाला किंमत असते, पण आपल्याकडे? आपल्याकडे लोकांच्या जिवापेक्षा सरकारला ‘इव्हेंटबाजी’ महत्त्वाची वाटते.
आम्हाला गाणी गाणारे रस्ते नकोत, तर दर्जेदार रस्ते हवे आहेत! मुंबईकर टॅक्स भरतोय तो तुमच्या ‘इनोव्हेटिव्ह स्टंट’साठी नाही, तर एका सुरक्षित आयुष्यासाठी … त्यामुळे हे असले ‘म्युझिकल’ नखरे थांबवा आणि आधी लोकांना एक सुरक्षित आयुष्य देण्याची ‘बेसिक’ मागणी पूर्ण करा. जनतेच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवा!
– अमित राज ठाकरे
