Photo Story: काहीच राहिलं नाही… पाणीच पाणी आहे…; देवेंद्र फडणवीसांची अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी
अतिवृष्टी आणि पूर अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. सत्य परिस्थिती सरकारला समजावी आणि जेथे कमतरता आहे, तेथे त्या गोष्टींची पूर्तता व्हावी, यासाठी हा दौरा काढण्यात आला आहे. (Devendra Fadnavis and Pravin Darekar on rain and flood affected area Washim, Hingoli and Nanded)
नांदेड: अतिवृष्टी आणि पूर अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. सत्य परिस्थिती सरकारला समजावी आणि जेथे कमतरता आहे, तेथे त्या गोष्टींची पूर्तता व्हावी, यासाठी हा दौरा काढण्यात आला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे 100 टक्के सोयाबीन गेले आहे. शेतात काहीच राहिलं नाही. नुसतंच पाणीच पाणी आहे. मोठे नुकसान झालं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीची पाहणी करत आहेत. गावात जाऊन अतिवृष्टीची माहिती घेतानाच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतीची पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधत असून त्यांच्या व्यथा, वेदना जाणून घेत आहेत. तसेच अधिकाऱ्यांकडूनही नुकसानीची माहिती घेतानाच पंचनामे कुठपर्यंत आले याची माहितीही घेतली जात आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील नुकसानीची पाहणी केली. मोझरी येथे सोयाबीनचे झालेले नुकसान पाहून मन सुन्न झाले. त्यातही संतापजनक म्हणजे पैसे घेतल्याशिवाय नुकसान भरपाई मिळणार नाही, हे त्यांना अधिकाऱ्यांकडून मिळणारे उत्तर. आधीच आमचा शेतकरी संकटात, त्यात हे दुहेरी संकट, असा संताप फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
फडणीस यांनी हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करताना कन्हेरगाव येथे मधुकर गावंडे यांच्या शेतात पाहणी केली. सुमारे साडेचार एकरात सोयाबीनचे संपूर्ण नुकसान झाले आहे. अशा अनेक शेतकऱ्यांचे डोळे सरकारकडे लागून आहेत, असं ते म्हणाले. काही शेतांमध्ये हळदीचे तर नुकसान झालेच आहे. पण सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असंही त्यांनी सांगितलं.
त्यानंतर त्यांनी वाशिम जिल्ह्यातील राजगाव येथे सुद्धा अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. पीक वरून हिरवे दिसते. पण आतमध्ये हळद पूर्णपणे सडलेली. नुकसान मोठे आहे. त्यांना तातडीने मदतीची गरज आहे, असं यावेळी ते म्हणाले.
हिंगोली जिल्ह्यातील आडगाव येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा, दुःख जाणून घेतले. त्यांना सर्व प्रकारची मदत मिळण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील, असं सांगून त्यांनी शेतकऱ्यांना अश्वस्त केलं. यावेळी फडणवीस आणि दरेकरांनी शेतात जमिनीवर बसून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एका शेतकऱ्याने मोठमोठ्याने टाहो फोडत आपल्या वेदना मांडल्या. यावेळी त्याला अश्रूही अनावर झाले होते.
तुम्ही मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना मदत मिळाली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काहीच मदत मिळाली नाही, मिळणार पण नाही. आमच्या अपेक्षा फक्त तुमच्याकडून आहेत, असं एका शेतकऱ्याने त्यांना सांगितलं. हिंगोली जिल्ह्यातील आडगावमध्ये या शेतकऱ्याने फडणवीसांसमोरच ही बाब सांगितली. तसेच ठाकरे सरकारकडून आम्हाला काहीच अपक्षा नसल्याचंही स्पष्ट केलं.
हिंगोली जिल्ह्यातील माळहिवरा येथील सोयाबीनच्या शेतातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी फडणीस यांनी संपूर्ण शेतात फिरून पाहणी केली. तसेच या संपूर्ण परिसरात किती शेतीचं नुकसान झालं याची माहिती घेतली. तसेच सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचं आश्वासनही शेतकऱ्यांना दिलं.
विदर्भ आणि मराठवाड्याच्या बाबतीत हे सरकार उदासीन आहे. आज शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहेत. उद्योगांची सवलत बंद केली आहे. पंचनामे औपचारिकता आहे. नजर आणेवारीत मोठे नुकसान दिसते आहे. त्यामुळे तातडीने मदत राज्य सरकारने दिली पाहिजे. जे विमा कंपन्या फोडायचे त्यांच्या काळात पीकविमाच मिळत नाही. सरसकट नुकसान भरपाई तातडीने द्यावी, ही आमची मागणी आहे. अनेक ठिकाणी पंचनामे करायला कुणी आलेले नाही. गेल्या आपत्तीतील मदत नाही. कर्जमाफी मिळालेली नाही. अनुदान नाही आणि अधिकारी नुकसानीचे पैसे देण्यासाठी पैसे मागत आहेत. दुहेरी मार शेतकऱ्यांना बसत आहे.
संबंधित बातम्या:
रामदास कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी माहीत नाही, पण शिवसेनेत मोठी खदखद: देवेंद्र फडणवीस
सरकारला जागं करण्यासाठी निघतोय, दोन्ही विरोधी पक्षनेते पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर
नागपुरात सभांचा धडाका, ग्रामीण भागातही रंग चढला, ZP, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला
(Devendra Fadnavis and Pravin Darekar on rain and flood affected area Washim, Hingoli and Nanded)